‘ठाकरे सरकारचा निर्णय तकलादू’, शेतकऱ्याच्या प्रश्नांवरून राजूशेट्टींकडून ‘महाविकास’ सरकारचा ‘समाचार’

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत ते म्हणाले कि, ‘राज्यातील ७५ टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नसल्याने ठाकरे सरकारचा हा निर्णय तकलादू आहे. निव्वळ शेतीवर अवलंबून असणारा शेतकरी आणखी कर्जात गुंतत असताना सातबारा कोरा झाला का, असा सवाल त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. संघटनात्मक बांधणीच्या उद्देशाने राजू शेट्टी सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत.

बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले कि, ‘दोन्ही कर्जमाफींचा कित्येक शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. एक लाखाच्या आत शून्य टक्के व दोन लाखांपर्यंतच्या कर्जावर डॉ. पंजाबराव देशमुख शेतकरी व्याज सवलत योजनेतून तीन टक्के व्याजाची आकारणी होते. यानंतरच्या रकमेवर शेतकऱ्यांना १२ ते १३ टक्के व्याज मोजावे लागते. या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला का?, आजही राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. दररोज १० शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. हे चित्र निराशाजनक असल्याचे शेट्टी यांनी यावेळी म्हंटले आहे.

तसेच सध्याचा काळ शेतकऱ्यांसाठी अत्यंत कठीण आहे. दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती व ऑक्टोबर महिन्यातील अवकाळी पावसामुळे पश्चिम विदर्भातील खरिपाचा हंगाम उद्ध्वस्त झाला, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेती पिकांच्या नुकसानीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हेक्टरी २५ हजार रुपये मदतीची मागणी राज्यपालांकडे केली होती. मात्र, सत्तेत येताच त्यांना याचा विसर पडला. हमीभाव व प्रत्यक्ष विक्री झालेला दर यामधील तफावत शासनाने शेतकऱ्यांना द्यायला हवी, तरच भ्रष्टाचार थांबेल व शासनाची पै न पै मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, असेही शेट्टी यावेळी म्हणाले.

तसेच, सध्या देशात वाढती बेरोजगारी, आर्थिक मंदी, घसरला जीडीपी अशा अनेक समस्या आहेत. ज्यावरून नागरिकांचे लक्ष हटवून त्यांना भावनिक प्रश्नात गुंतवून सीएए, एनआरसीसारखे विषय बाहेर काढत माणसा-माणसांत भेदभावाचे वातावरण निर्माण केले जात आहे. मात्र या सरकारचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. ज्यांच्याजवळ मालमत्ता, शेती नाही, असे आदिवासी, भूमीहिन कुठून आणणार पुरावे? त्यांच्याकडे पुरावे नाहीत म्हणून त्यांना देशाबाहेर काढणार का, छावणीत ठेणार का, असा सवाल करत राजू शेट्टी यांनी सरकारचा चांगलाच समाचार घेतला.