बंदरावर अडकलेला कांदा निर्यातीस वाणिज्य विभागाचा ‘ग्रीन’ सिग्नल !

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – वाणिज्य मंत्रालयाने दिनांक 14 आणि 15 सप्टेंबर रोजी निर्यातीची परवानगी मिळालेल्या कांद्याला निर्यात करण्यास परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. देशातील सीमेवर आणि बंदरावर मोठ्या प्रमाणामध्ये कांदा हा निर्यातीच्या आदेशानंतर अडकून पडलेला होता. राज्यांमधील शेतकरी आणि शेतकरी संघटनेने याचा तीव्र निषेध करत रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. सर्वत्र शेतकऱ्यांचा रोष पाहता वाणिज्य मंत्रालयाने १४ आणि १५ सप्टेंबर रोजी अडकलेल्या कांद्याला निर्यातीची परवानगी दिली आहे मात्र नव्याने कांदा निर्यात बंदी कायम असल्याचे पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

निर्यातीसाठी परवानगी दिलेला कांदा हा बंदरावर आणि बॉर्डरवर मोठ्या प्रमाणामध्ये अडकलेला होता.
निर्याती खुली असल्याने व्यापारी वर्गाचा कांदा हा बॉर्डरवर आणि बंदराव निर्याती साठी सज्ज होता. मात्र एकाएकी निर्यात बंदीच्या घेतलेल्या निर्णयामुळे जवळपास २२ ते २५ हजार मेट्रिक टन कांदा बंदरावर अडकून पडलेला होता. जर वाणिज्य मंत्रालयाने निर्यात बंदीचा निर्णय मागे घेतला नसता तर मोठ्या प्रमाणामध्ये कांदा सडला असता यामुळे व्यापारी आणि शेतकरी उध्वस्त झाला असता.

निर्यातबंदी घोषित होताच लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये एक हजार रुपयाची घसरण पाहायला मिळाली होती कांद्याचे दर ठरविणाऱ्या नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकरी आणि रयत क्रांती संघटने मोठ्या प्रमाणात आंदोलन करत मंत्र्यांना रस्त्यावरती फिरू देणार नाही अशा प्रकारचा इशारा दिला होता. वाणिज्य विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे काही प्रमाणात का होईना व्यापारी आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र नवीन कांदा निर्यातीबाबत कुठल्याही प्रकारचा खुलासा करण्यात आलेला नसल्याने फक्त १४ आणि १५ सप्टेंबर पर्यंत परवानगी मिळालेल्या कांद्याची निर्यात होणार आहे.