राज्यात काँग्रेसचे नेतृत्व बदलणार ?; नाना पटोले यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा जाणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेतृत्व बदलणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. यातच त्या दिशेने वेगाने घडामोडी घडू लागल्यात. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा देण्याचा निर्णय काँग्रेस श्रेष्ठींनी घेतला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच यासोबत राज्य सरकारमध्येही महत्त्वाचे बदल होणार आहेत, असेही संकेत मिळत आहेत.

नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यास विधानसभेचे अध्यक्षपद कुणाकडे जाणार?, हा कळीचा प्रश्न होता. त्याबाबत काँग्रेस नेतृत्वाकडून मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याचे कळत आहे. या चर्चेतून नवा फॉर्म्युला पुढे आलाय. त्यानुसार विधानसभेचे अध्यक्षपद शिवसेनेकडे जाईल. त्याबदल्यात काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद दिले जाणार आहे, असे सूत्रांकडून माहिती मिळालीय. दोन्ही पक्षांनी व मुख्यमंत्र्यांनीही हा प्रस्ताव मान्य केला आहे, असे सांगण्यात येत आहे.

नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदासह मंत्रिमंडळातही आपला सहभाग असावा, अशी अपेक्षा श्रेष्ठींकडे व्यक्त केलीय. त्याला श्रेष्ठींचा हिरवा कंदील मिळालाय. त्यानुसार सध्याच्या मंत्रिमंडळातील काँग्रेसच्या ज्या मंत्र्याची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागणाराय, त्या मंत्र्याकडचे खाते पटोले यांच्याकडे जाणार, असेही स्पष्ट झालंय.

काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद मिळाल्यास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार या तिघांपैकी एका मंत्र्याची या पदावर वर्णी लागणार आहे, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. यात थोरात यांचे नाव आघाडीवर आहे. राज्यात काँग्रेसने विधानसभा निवडणूक थोरात यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आलीय.

काँग्रेस पक्ष आज राज्यामध्ये सत्तेत असण्यात बाळासाहेब थोरात यांचा मोठा वाटा आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीतील अन्य पक्षांसोबत सातत्याने समन्वय ठेवण्याचे काम थोरात यांनी केलंय. त्यामुळे आघाडीतील समतोल आजही टिकून राहिला आहे. बाळासाहेब थोरात यांच्यासाठी ही बाब चांगली मानली जातेय.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र काँग्रेसलाही उपमुख्यमंत्रिपद मिळणार, या चर्चांत काहीही तथ्य नाही, असे म्हंटलंय. सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे या तीन नेत्यांनी मिळून महाविकास आघाडीला मूर्तरूप आणलंय. त्यांनी जे निर्णय घेतले आहेत ते पुढे नेण्याचे काम आम्ही करतोय. काँग्रेसमध्ये अंतर्गत बदल होत असतील तर त्यात बाकी कुणी पडण्याचे कारण नाही, असेही अजित पवार म्हणाले आहेत.