…म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आपल्याच पक्षाच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्याचा पुतळा जाळण्यात आला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी राज्यसभा खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केल्यानंतर जम्मू-काश्मीरमधल्या कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुलाम नबी आझाद यांच्याविरोधात मंगळवारी जम्मूत जोरदार घोषणाबाजी केली व गुलाम नबी आझाद यांचा पुतळा देखील जाळण्यात आला. यावेळी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते जम्मूत रस्त्यावर उतरले होते. आझाद पक्षाविरुद्ध कारवाया करत असल्याचा आरोप करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. तसेच सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत गुलाम नबी आझाद यांचा पुतळा जाळण्यात आला.

काय म्हणाले होते गुलाम नबी आझाद
गुलाम नबी आझाद यांनी जम्मू येथील एका सभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले होते. आझाद यांनी मला अनेक नेत्यांच्या अनेक गोष्टी आवडतात. मी स्वतः एका खेड्यातून आलो आहे. मला याचा अभिमान वाटतो. तसेच ते म्हणाले आपले पंतप्रधानही बोलताना सांगतात कि, तेसुद्धा एका गावातूनच आले आहेत. काहीच नव्हते, भांडी घासत होते, चहा विकत होते. पुढे ते बोलले, आमचे राजकीय मतभेद आहेत. मात्र, किमान जे आपले वास्तव आहे, ते लपवत नाहीत. जे लोक आपले वास्तव लपवतात. ते खोट्या विश्वात राहतात. व्यक्तीला अभिमान असायला हवा असे ते जम्मू मधील सभेमध्ये बोलले होते.

गुलाम नबी आझाद जम्मू येथे गुज्जर देश चॅरिटेबल ट्रस्टच्या एका कार्यक्रमासाठी आले होते. त्या ठिकाणी त्यांनी ट्रस्टचे सर्वात पहिले ट्रस्टी मसूद चौधरी यांच्या नावाने सुरू केलेल्या लायब्ररीचे उद्घाटन केले. यानंतर त्यांच्याकडून गुज्जर बकरवाल समुदायाला संबोधित करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींची खरे बोलण्यावरून प्रशंसा केली होती. गुलाम नबी आझाद हे नुकतेच राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत. आझाद यांच्या निरोपाच्या वेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे जबरदस्त कौतुक केले होते. यावेळी मोदी भावूकसुद्धा झाले होते. यानंतर आझादांनीसुद्धा मोदी यांचे आभार मानत कौतुक केले होते.

गुजरातमध्ये नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भाजपाने आपला गड राखत निर्भेळ यश मिळविले आहे. सहा महापालिकांच्या एकूण ५६७ जागांपैकी भाजपाने ४९० जागा जिंकल्या तर काँग्रेसला फक्त ४८ जागा जिंकता आल्या आहेत. या निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून निराशा व्यक्त केली जात आहे. यावर त्यांनी जोरदार विरोध प्रदर्शन देखील केले होते. पक्षाच्या कार्यालयाबाहेर जिल्हा आणि शहर अध्यक्षांचे पुतळे जाळण्यात आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेट्रोल टाकून बाबू रायका, कादिर पीरजादा आणि तुषार चौधरी यांचे पुतळे जाळले आणि आरोप केला की या लोकांनी काँग्रेसला विकलं आहे. कार्यकर्त्यांकडून या नेत्यांचे फोटो देखील फाडण्यात आले. या निवडणुकीत आपच्या रूपाने एक नवा पर्याय समोर आला आहे.