Coronavirus : भारतात कोरोनाच्या रूग्णांची संख्या 31 वर पोहचली, तिघांवर यशस्वी उपचार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीन मधील कोरोना व्हायरस हा 80 देशांमध्ये पसरला आहे. आता भारतात देखील हा विषाणू आला आहे. भारतामध्ये कोरोना ग्रस्तांची संख्या 31 वर पोहचली आहे. यामध्ये तीन रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार करण्यात आले आहेत. आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी असा दावा केला आहे की, देशातील कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी सरकारने पूर्णपणे तयारी केली आहे.

या 31 रूग्णांपैकी 16 रुग्ण इटलीचे रहिवासी आहेत जे भारतात फिरायला आले होते. गुरुग्राममध्ये 31 पैकी 15 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, दिल्ली रुग्णालयात 10 रुग्ण दाखल आहेत, एक रुग्ण तेलंगणात आहे, तर 2 रुग्ण जयपूरमध्ये आहेत.

आणखी 19 लॅब होणार तयार :
कोरोना विषाणूचा संशय असलेल्या लोकांच्या चौकशीसाठी सरकारने यापूर्वीच 15 प्रयोगशाळेची स्थापना केली आहे आणि आता 19 आणखी प्रयोगशाळेची तयारी सुरू केली आहे.

पर्यटनाला बसला फटका

पर्यटनस्थळी आता लोकांची संख्या कमी होत चालली आहे. गोवा आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असल्याने इथं परदेशी पर्यटकांची ये जा ही मोठी असते. त्यामुळे गोव्यात सुरुवातीपासून कोरोना व्हायरसची भीती दिसून येत आहे. देशात दिल्ली जयपूर पाठोपाठ अन्य ठिकाणीही कोरोना व्हायरसचे पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. सध्या परीक्षांचे दिवस असल्याने या कमी होणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत अधिकच भर पडताना दिसत आहे.

शाळांना सुट्या, पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम रद्द

दिल्लीमध्ये पाचवी पर्यंत सर्वच शाळांना 31 मार्च पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युरोपियन देशांचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.