पालकांनो तुम्हीच सांगा शाळा कधी उघडायच्या, सरकारने मागितला ‘फीडबॅक’

पोलिसनामा ऑनलाईन – लॉकडाउनमुळे शाळा बंद असून विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेत आहेत. मात्र अद्यापही पालकांना शाळा नेमक्या कधी सुरु होणार ही चिंता सतावत आहे. यादरम्यान मानव संसाधन विकास मंत्रालयाचा भाग असणार्‍या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवले आहे. त्यानुसार पालकांकडून शाळा कधी सुरु कराव्यात यासंबंधी मत मागवण्यास सांगितले आहे. ऑगस्ट, सप्टेंबर की ऑक्टोबर कोणत्या महिन्यात शाळा सुरु करणे तुम्हाला योग्य वाटते अशी विचारणा पालकांकडे करण्यास सांगण्यात आले आहे.

राज्यांना अभिप्राय नोंदवण्यासाठी तीन दिवसांची डेडलाइन देण्यात आली आहे. 17 जुलै रोजी सर्व राज्यांच्या शिक्षण सचिवांना पाठवण्यात आलेल्या पत्रात मंत्रालयाकडून विनंती करण्यात आली आहे की, शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून 20 तारखेपर्यंत अभिप्राय नोंदवला जावा. मंत्रालयाकडून दोन प्रश्नांवर पालकांचे मत मागवण्यात आले आहे. यामधील पहिला प्रश्न म्हणजे, ऑगस्ट, सप्टेंबर की ऑक्टोबर कोणत्या महिन्यात शाळा सुरु करणे पालकांना अनुकूल वाटत आहे. दुसरे म्हणजे शाळा सुरु झाल्यानंतर पालकांच्या काय अपेक्षा असणार आहेत.

एकीकडे अधिकार्‍याने राज्यांना पत्र पाठवल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असताना दुसरीकडे शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. अभिप्राय देण्यासाठी सोमवारची डेडलाइन असताना अद्यापही अनेक शाळांना याबद्दल कोणतीच माहिती नसल्याचं कळत आहे.