… तर भाजपानं राज्यात ‘तांडव’ केलं असतं, शिवसेनेची PM मोदींवर टीका

पोलिसनामा ऑनलाईन टीम – आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आहेत. 2014 मध्ये क्रूड ऑईल प्रति बॅरेल 130 डॉलर्स होते. ते आता प्रति बॅरल 23 डॉलर एवढे खाली घसरले आहे. मात्र , भारतात पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती त्याप्रमाणात खाली आलेल्या नाहीत. म्हणजे या व्यवहारातून मोदी सरकारला निव्वळ नफा 20 लाख कोटी इतका झाला. या नफ्यातील किती हिस्सा कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढ्यात वापरला जात आहे?, असा सवाल उपस्थित करत शिवसेनेने राज्यातील भाजपा नेत्यांवर टीकास्त्र सोडले आहे.

कोरोनामुळे महाराष्ट्रासमोर आर्थिक आव्हान उभे राहिले आहे. यासंदर्भात राज्य सरकारने केंद्राकडे मदतीची मागणी केली आहे. याच मुद्यावरून शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र भाजपावर टीकेचे बाण सोडले आहेत. भाजपाचे अध्यक्ष डॉ. नड्डा यांनी एकवेळच्या जेवणाचा त्याग करा, असे आवाहन केले आहे. कोरोनाच्या लढाईत प्रत्येक नागरिकाचा सहभाग असायलाच हवा आणि आपापल्या मगदुराप्रमाणे त्याने मदत केली पाहिजे. तथापि जनतेला हे सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्रात ठिकठिकाणी दोनवेळच्या जेवणा-खाण्याची व्यवस्था सामान्य कार्यकर्ते करीत आहेत.

पण या संकटसमयी काही लोक मास्कवरही आपली नावे छापून त्याचे वितरण करीत आहेत. महाराष्ट्रातील भाजपा महामंडळाने त्यांचा निधी राज्यात नव्हे, तर केंद्रात वळवला आहे. त्यांचा मुख्यमंत्री सहायता निधीवर विश्वास नाही. राज्यपाल हे महाराष्ट्राचे घटनात्मक प्रमुख. त्यांनी तरी त्यांचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत वळवून अतरंगी भाजपाईंना चपराक द्यायला हवी होती, पण राज्यपालही दिल्लीच्याच मार्गाने निघाले. राज्यपाल हे भले गृहस्थ आहेत. समजा, महाराष्ट्रात काँग्रेसचे राज्य असते व हे असे अतरंगी वर्तन काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी व राज्यपालांनी केले असते तर भाजपने महाराष्ट्रात तांडव केले असते. अशी टीका शिवसेनेने केली आहे.