मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी कधीपर्यंत बंद राहणार ? ‘या’ दिग्गज मंत्र्यानं दिलं उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ठाकरे सरकारने राज्यात 1 जूनपर्यंत लॉकडाउन जाहीर केला आहे. यात सर्वसामान्यांसाठी लोकल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान आणखी 15 दिवस तरी लोकलचे दरवाजे उघडले जाणार नाहीत, अशी शक्यता राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. लोकल ट्रेनमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळणे शक्य नाही. त्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच सुरु राहतील, असे ते म्हणाले.

मंत्री वडेट्टीवार प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, कोरोना रुग्णसंख्या खालावत असलेल्या जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील करण्याचा सरकार विचार करत आहे. राज्य सरकार 1 जूननंतर रेड झोनच्या बाहेर असणाऱ्या जिल्ह्यांत काही निर्बंध शिथील करण्यासंबंधी विचार करत आहे. सध्या 36 पैकी 15 जिल्हे रेडझोनमध्ये असून तिथे निर्बंध अजून कठोर केले जाऊ शकतात, असे वडेट्टीवार म्हणाले. बुलढाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदूर्ग, सोलापूर, अकोला. सातारा, वाशीम, बीड, गडचिरोली, अहमदनगर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये करोना रुग्णसंख्या जास्त असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली. लॉकडाउनचे निर्बंध शिथील करावेत, अशी मागणी होत असून सरकार निर्णय जाहीर करण्याआधी पुढील 4 ते 5 दिवस परिस्थितीची पाहणी करणार असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केेले आहे.