भारताच्या हवामान खात्याचं संयुक्त राष्ट्राकडून कौतुक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विनाशकारी ‘फनी’ चक्रीवादळाने शुक्रवारी ओडिशाच्या सागरी किनारपट्टीला जोरदार धडक देत हाहाकार माजवला. मात्र हवामान खात्याचा अचूक अंदाज व ओडिशा सरकार आणि प्रशासन वेळीच सतर्क राहिल्याने मोठी हानी टळली आहे. ‘फनी’चक्रीवादळासंदर्भात अगदी अचूक अंदाज वर्तवल्याबद्दल भारतीय हवामान खात्याचा संयुक्त राष्ट्राने गौरव केला आहे.

‘फनी’ चक्रीवादळ जमिनीवर नेमकं कुठे धडकणार, किती वाजता धडकणार, त्याची तीव्रता काय असणार, दिशा काय असणार याचा अगदी बरोबर अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यामुळे सुमारे १० लाख लोकांना वेळेत सुरक्षित स्थानी हलवण्यात आले. रेल्वे आणि विमान सेवांनी या अंदाजानुसार आपल्या वेळापत्रकात बदल केले. त्यामुळे प्रवासी अडकून पडण्याच्या घटना फारशा घडल्या नाहीत आणि मोठे अपघातही वाचले. प्रशासनाच्या इशारा प्रणाली आणि युध्द पातळीवरील तयारीमुळे हजारो लोकांचे जीव वाचवण्यात यश आले आहे. हवामानाचा अंदाज आणि वेळेत आणि बरोबर वर्तवल्यामुळे कित्येकांचे प्राण वाचले, असं राष्ट्रसंघाने म्हटलं आहे.

या वादळाचे गांभीर्य लक्षात घेता यात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या कमी आहे. कारण याआधी झालेल्या अशा वादळामुळे १० हजारहून अधिक लोकांचे जीव गेले होते. या वादळामुळे दळणवळण यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत झाली. मात्र भारतीय हवामान विभागाने विकसित केलेल्या प्रादेशिक वादळ प्रणालीने मोठे नुकसान रोखण्यासाठी मदत केली. यावरून या विभागाने हेच दाखवून दिले की, १९९९ च्या वादळानंतर हवामान खाते अशा वादळावर लक्ष ठेवण्यासाठी किती दक्ष आहे.