पोलीस बदल्यांच्या घोळांमुळं अधिकाऱ्यांमध्ये नाराजी ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य पोलीस दलातील कोरोनामुळं रखडलेल्या बदल्यांचा यंदाचा घोळ अजूनही संपलेला नाही. उलट दिवसेंदिवस त्याचा गुंता वाढत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. गृह विभागाकडील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या प्रलंबित असताना महासंचालक स्तरावरील बदल्यांना अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. त्यामुळं अधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

ऑक्टोबरचा पहिला आठवडा होत आला तरी अद्याप 15 हून अधिक आयपीएस अधिकारी, अप्पर अधीक्षक आणि डीजी गॅझेट झालेला नाही. पहिली यादी जाहीर करण्यास 2 सप्टेंबर उजाडला. त्यानंतर 30 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 43 आयपीएस व 107 उपअधीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले. परंतु अद्याप तितक्याच बदल्या बाकी आहेत. त्यासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढवली आहे. सलग चौथ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.

मुख्यालय स्तरावरील कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायसवाल यांनी कोणतेच संकेत दिले नाहीत. त्यामुळं ज्या अधिकाऱ्यांचा नक्षलग्रस्त भाग, नागपूर आणि साईड ब्रँचला कालावधी पूर्ण झाला आहे ते बदलीसाठी अस्वस्थ झाले आहेत.

डीजींबद्दल अफवांचे पेव
सुबोधकुमार जायसवाल हे 6 ते 8 ऑक्टोबरदरम्यान किरकोळ रजेवर जाणार आहेत. मात्र राज्यकर्त्यांसोबत पटत नसल्यानं ते दीर्घकाळ रजेवर तर 1 नोव्हेंबरपासून केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाणार अशा अफवा पोलीस वर्तुळात वेगानं पसरत आहेत.

20 हून अधिक DYSP ची मॅटमध्ये धाव
उपअधीक्षकांच्या 105 बदल्यांपैकी अनेकांना कालावधी पूर्ण होण्यापूर्वी हलवण्यात आलं आहे. त्यापैकी सुमारे 20 हून अधिक अधिकाऱ्यांनी त्याविरूद्ध मॅटमध्ये धाव घेतली आहे.