पाण्याच्या आवर्तनाचे योग्य नियोजन करा : विभागीय आयुक्त राजाराम माने
विभागीय आयुक्तांचे जिल्हा प्रशासनाला आदेश
अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – धरणातून शेतीसाठी आणि पिण्यासाठी सोडण्यात येण्याऱ्या पाण्याच्या आवर्तनासंदर्भात योग्य नियोजन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते.
श्री. माने म्हणाले, भंडारदरा, मुळा व कुकडी धरणातून शेतीसाठी व पिण्यासाठी सोडण्यात येणा-या पाण्याच्या आवर्तनाचे नियोजन करण्यात यावे. आवर्तन सोडल्यानंतर आवर्तनाच्या भागातील किती पाण्याचे टॅन्कर कमी झाले याचाही आढावा श्री माने यांनी यावेळी घेतला. ज्याठिकाणी प्राधान्याने पिण्यासाठी पाणी सोडले जात आहे, ते त्या कारणासाठीच वापरले जात आहे,याची खात्री करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
जिल्हाधिकारी श्री द्विवेदी म्हणाले, पिण्याच्या पाण्याचे टँन्कर मंजूर करताना ज्या भागात पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात येते, त्या भागातील टॅन्कर कमी करण्यात यावे.तसेच टॅन्कर मंजूर करताना लोकसंख्या विचारात घेऊनच टॅन्करला मंजूरी देण्यात यावी. जिल्हयातील चारा छावणीत दाखल झालेल्या जनावरांची स्थानिक पातळीवर तपासणी करण्यात यावी. चारा छावणीचे देयके जास्त कालावधीसाठी प्रलंबित ठेवण्यात येऊ नये. चारा छावणीतील शेतक-यांना शासन निर्णयानुसार सुविधा दिल्या जावेत तसेच चारा छावणीतील जनावरांच्या टैगिंगचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या.
प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी अहमदनगर जिल्हयातील पर्जन्यमान, भुजलपातळी, पाणीसाठा याबाबत माहिती दिली. जिल्हयात नागरी भागात 59 व ग्रामीण भागात 694टॅन्कर चालू आहेत. जिल्हयात 503 छावण्या मंजूर करण्यात आल्या असून 472 छावणी कार्यरत आहेत. या छावणीमध्ये लहान 40 हजार 464 व मोठे 2 लाख55 हजार 497 असे एकूण 2 लाख 95 हजार 961 जनावरे दाखल आहेत. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत 868 कामावर 7हजार 454 मजूर काम करीत असल्याची माहिती यावेळी दिली.