कमलनाथ सरकार पाडण्यात मोदींची महत्त्वाची भूमिका, भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांच्या विधानाने खळबळ

इंदूर : वृत्तसंस्था – केंद्रसरकारने कृषी संदर्भात केलेल्या तीन कायद्याविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाने उग्र रुप धारण केले आहे. आंदोलकांबरोबर झालेल्या चर्चेतून काही मार्ग निघाला नाही त्यामुळे भाजपने संपूर्ण देशातील विविध शहरात शेतकरी संमेलनाचं आयोजन केले आहे. इंदूर येथे शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना भाजपाचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ सरकार पाडण्यासाठी कोणाची महत्त्वाची भूमिका राहिली असेल तर ती पंतप्रधान नरेंद्र मोदींची आहे असं मोठं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.दरम्यान, आम्ही आजपर्यंत जे आरोप केले त्याला विजयवर्गीय यांनी दुजोरा दिला आहे. असं काँग्रेसन म्हंटल आहे.

इंदूर येथे शेतकरी संमेलनाची जबाबदारी कैलास विजयवर्गीय आणि नरोत्तम मिश्रा यांना देण्यात आली. यावेळी भाषणादरम्यान कैलास विजयवर्गीय म्हणाले की, जोपर्यंत कमलनाथ सरकार मध्य प्रदेशात होती, एकदिवसही सुखाने झोपू दिले नाही. कमलनाथ यांना स्वप्नातही भाजपचा कार्यकर्ता दिसत असेल ते नरोत्तम मिश्रा आहेत. पडद्यामागील एक गोष्ट सांगतो, कुणालाही सांगू नका, मीदेखील आजपर्यंत कोणाला सांगितलं नाही. पहिल्यांदाच या व्यासपीठावरून सांगत आहे, कमलनाथ यांचे सरकार पाडण्यामध्ये जर कोणाची महत्त्वाची भूमिका असेल तर ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे. धर्मेंद प्रधान यांची नव्हती, ही गोष्ट कोणालाही सांगू नका, मीदेखील कोणाला बोललो नाही असं कैलाश विजयवर्गीय यांनी सांगितले.

विजयवर्गीय यांच्या विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आम्ही आजपर्यंत जे आरोप केले त्याला विजयवर्गीय यांनी दुजोरा दिला आहे. अशा शब्दात काँग्रेसने यावर प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसच्या सर्व आरोपांची खातरजमा स्वत: भाजपाचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी शेतकरी संमेलनात दिली आहे. प्रदेशातील लोकप्रिय आणि जनादेशाचं कमलनाथ सरकार नरेंद्र मोदींच्या इशाऱ्यावर पाडण्यात आलं असं काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलूजा यांनी सांगितले.

दरम्यान, काँग्रेसच्या अंतर्गत वादातून कमलनाथ सरकार पडलं पण कैलाश विजयवर्गीय यांच्या विधानामुळे हे स्पष्ट झालं आहे की काँग्रेसने केलेले आरोप सत्य आहेत. भाजप लोकांची फसवणूक करत आहे, काँग्रेस सरकार असंवैधानिकपणे पाडण्यात देशाच्या सर्वोच्च पदावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात आहे असंही काँग्रेसने सांगितले.