Coronavirus :मुंबईतील दाट लोकवस्तीत ‘निर्जंतुकीकरण’ करण्यासाठी सरकारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. मुंबईत दाट लोकवस्ती असलेल्या वस्त्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने राज्य सरकारची चिंता वाढली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. दाट लोकवस्तीच्या भागात लॉकडाऊन अधिक प्रभावी करण्यासाठी आणि निर्जंतुकीरणासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

यासंदर्भात आरोग्य विभागाने महापालिकेला सूचना केल्या आहेत. दाट लोकवस्ती असलेल्या या भागात राज्य राखीव पोलीस दलाची मदत घेण्यातही गृहमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली आहे. आरोग्यमंत्र्यांनी नुकतीच मुंबईतील मंत्रिमंडळ सदस्य असलेल्या लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. गर्दी आणि दाट लोकवस्तीच्या ठिकाणी संसर्ग रोखण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले.

गर्दीच्या ठिकाणी राज्य राखीव पोलीस दल तैनात करण्यात यावे. नियंत्रण कक्षाच्या मदतीने सीसीटीव्ही द्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. मात्र रस्त्यांवरील गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी आता ड्रोनची मदत घेण्याबाबत या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे. सीसीटीव्ही, एसआरपीएफ, ड्रोन यांचा वपर करून लॉकडाऊनचे पालन अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न पुढील काळात होणार आहे.

धारावीसारख्या दाटीवाटीच्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढल्याने प्रशासनाने वेगाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या ठिकाणी कोणाच्याही घरात शौचालय नसल्याने सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि शौचालयाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. अशावेळी अग्निशमन दलाची वाहने आणि पॉवर जेटचा वापर करून हे शौचालये वारंवार स्वच्छ करण्यात येणार आहे. तसेच ड्रोनचा वापर करून निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करण्याचे काम करावे अशा सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.