एल्गार परिषद तपास ! राज्य शासनाला स्वतंत्र चौकशीचा अधिकार, पोलिसांचीही चौकशी व्हावी : शरद पवार

जळगाव : पोलिसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे सोपवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले असून एल्गार आणि कोरेगाव – भीमा प्रकरणी एसआयटीद्वारे समांतर चौकशीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अद्याप आग्रही असल्याचे दिसत आहे. तसेच राज्य सरकारकडून समांतर चौकशीसंदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संकेत दिले असताना त्यानंतर शरद पवार यांनीही आज स्वतंत्र चौकशीबद्दल जळगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलले आहे.

दरम्यान पवारांनी प्रश्न करत भीमा-कोरेगाव आणि एल्गार परिषद हे वेगळे विषय असून विद्रोही साहित्य लिहिणे, सरकारच्या विरोधात बोलणे हा दशद्रोह होऊ शकतो का, असे म्हटले आहे. एनआयएकडून तपास करणे हा केंद्राचा अधिकार असून राज्याला देखील त्याचे अधिकार आहेत. राज्य सरकारला विश्वासात घ्यायला हवे. हे प्रकरण घडले त्यावेळी फडणीस यांचे सरकार होते. तेव्हा या घटनेत काहीतरी लपवण्यासारखे असल्यानेच केंद्राने हा तपास एनआयएकडे दिला आहे, असा आरोपही शरद पवार यांनी केला.

हा तपास केंद्राकडे सोपवल्याने महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडली असल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच शरद पवार यांनी वेगळ्या चौकशीची मागणी केल्याने गोंधळ निर्माण झाला आहे.

कोरेगाव – भीमा प्रकरणी २२ गुन्ह्यांचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांकडे असेल. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करावी, असे पत्र शरद पवार यांनी ठाकरे यांना पाठवले असता अनिल देशमुख यांनी संबंधित फाइलवर एसआयटी नेमण्याची शिफारस केली होती. ती नाकारत हा तपास एनआयएकडे देण्यासाठी संमती दिल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.