एर्टीगाची ३ दुचाकींना धडक ; ५ जणांचा मृत्यू

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – भरधाव वेगातील मोटारीवरील ताबा सुटल्याने एर्टीगा मोटारीची धडक दुचाकींना बसल्याने दुचाकीवरील पाच जणांचा मृत्यू झाला. हा अपघात चाकण खालूब्रे गावच्या हद्दीत मंगळवारी रात्री साडेआकाराच्या सुमारास घडला.

या अपघातात चंद्रशेखर सूरज लाला विश्वकर्मा (38, भोसरी), सुनील शर्मा (48, भोसरी), दीपनारायण हरिवंश विश्वकर्मा (24), सत्यवान पांडे (45) आणि सर्वज्ञ संजय विश्वकर्मा (38, रा. चिखली) या पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एर्टीगा (एमएच १४, जेएन ३७६८) ही एचपी पेट्रोल पंपाकडून शिंदे वासुली चौकाच्या दिशेने निघाली होती. चालकाचा मोटारीवरील ताबा सुटल्याने मोटार रस्ता दुभाजकावर आदळली. त्यावेळी रस्त्याने जाणाऱ्या तीन दुचाकींना मोटारीची धडक बसली. त्यामुळे तीन दुचाकीवर असणारे पाच जण गंभीर जखमी झाले. मोटार पलटी झाली व चालक जखमी झाला. उपचारापूर्वी गंभीर जखमी पाच जणांचा मृत्यू झाला. तपास चाकण पोलीस करत आहेत.