राज्यातील ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर MPSC ने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची परिस्थिती पहाता खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना अन्य जिल्ह्याच्या परीक्षा केंद्रावर उपस्थितीत राहण्यास अडचणी येणार आहेत. यामुळे त्यांच्या सोयीसाठी आयोगाने 11 ऑक्टोबरला होणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीने जिल्हा केंद्र निवडण्याची संधी दिली आहे. तर 20 सप्टेंबरच्या राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी पुणे केंद्र निवडलेल्या दुसऱ्या विभागातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्यासाठी आयोगाने 20 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

प्रथम येणाऱ्यास प्राधान्य

जिल्हा केंद्र निवड न करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेसाठी भरलेल्या त्यांच्या अर्जातील कायमस्वरुपी रहिवासी पत्ता असलेल्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळणार आहे. जिल्हा केंद्राची क्षमता संपुष्टात आल्यानंतर जिल्हा केंद्राची निवड न करणाऱ्या अथवा निवड करु न शकलेल्या उमेदवाराला आयगाकडून उपलब्ध करून दिलेल्या केंद्रावर उपस्थितीत राहणे बंधनकारक राहणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

आयोगाकडून संदेश पाठवला जाणार

नव्याने जिल्हा केंद्र निवडण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या आयोगाकडील नोंदणीकृत मोबाइलवर मेसेज पाठवला जाणार आहे. व्यवस्थेप्रमाणे निवडण्यात आलेल्या जिल्हा केंद्र बदलण्याची विनंती यापुढे कोणत्याही कारणास्तव मान्य केले जाणार नाही, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांच्या हितासाठी निर्णय

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेड्यापाड्यातील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना सध्याच्या परिस्थितीत अन्य जिल्ह्याच्या परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्यास अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी आयोगाने आता सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणचे सोयीचे परीक्षा केंद्र निवडण्याची संधी उपलब्ध करुन दिली असल्याची माहिती, आयोगाचे सहसचिवर सुनिल आवताडे यांनी दिली.

ठळक मुद्दे

– राज्यसेवेची दुय्यम सेवा पूर्व परीक्षा 11 ऑक्टोबर रोजी घेण्याचे प्रस्तावित आहे.
– लॉकडाऊनमुळे अनेक विद्यार्थी आपल्या गावी परतले आहेत. त्यांच्या सोयीसाठी आयोगाने आपला निर्णय बदलला.
– सद्य स्थितीत प्रवासावरील व तात्पुरत्या वास्तव्यावरील निर्बंध पाहून आयोगाने सर्व विद्यार्थ्यांना जिल्हा केंद्र निवडण्याची संधी दिली.
– 21 ऑगस्टपासून दुपारी 2 ते 26 ऑगस्ट रात्री 23.59 (11.59) पर्यंत परीक्षा केंद्र निवडता येणार
– जिल्हा केंद्रावर उमेदवारांना प्रवेश द्यावयाची क्षमता पाहून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असणार
– संबंधित जिल्ह्यांमधील शाळा-महाविद्यालयांच्या स्थानिक पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेनुसार प्रवेशाची कमाल क्षमता निश्चित केली जाईल.