भाषणे, प्रसारमाध्यमांशी दुर रहा; कुटुंबियांचा पार्थ पवारांना सल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मावळ लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसने पार्थ अजित पवार यांना देण्यात आली आहे. त्यांचे पहिले तीन मिनिटांचे लिखित भाषण त्यांना नीट वाचता आले नाही. त्यामुळे सोशल मीडियामध्ये त्यांच्यावर टीका करण्यात आली. त्यानंतर झालेल्या सभेत सर्वांचे लक्ष पार्थ यांच्या भाषणाकडे लागले होते. मात्र पार्थ यांनी भाषण न करता आपली जागा घेतली.

बुधवारी मावळ तालुका प्रचार कार्यक्रमाचा शुभारंभ वडगाव मावळ येथे आयोजित करण्यात आला. यात गावपातळीपासून माजी मंत्र्यापर्यंत अनेकांनी भाषणे केली. मात्र, उमेदवार पार्थ पवार यांनी जाहीर सभेत बोलणे टाळले. त्यावरुन पहिल्याच भाषणाची खिल्ली उडवली गेल्याने प्रसार माध्यमांपासून तूर्तास दूर राहा, भाषण आणि प्रतिक्रिया देण्याच्या फंदात न पडता फक्त गाठीभेटीवर भर द्या, असा सल्ला पवार कुटुंबीयांनी पार्थ यांना दिला आहे, अशी माहिती मिळाली आहे.

पार्थ पवार यांच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस उमेश पाटील यांनी यावर आपले मत व्यक्त केले आहे. अजितदादा पवार हेसुद्धा राजकारणात प्रथम आले, त्या वेळी पहिल्या भाषणात भाषण न करताच खुर्चीत जाऊन बसले. मात्र, त्यानंतर उत्तम वक्ते आणि काम करणारे नेते म्हणून नावारूपास आले, असं त्यांनी म्हटलं. पार्थ म्हणजे अर्जुन असून त्यांच्या रथाचे सारथ्य करणारा मी कृष्ण आहे. त्यांना सर्वात जास्त मताधिक्क्याने निवडून आणण्याची जबाबदारी माझ्यावर पवार कुटुंबीयांनी सोपवली आहे, असंही त्यांनी म्हटलं.

पवार कुटुंबातील व्यक्ती निवडणुकीत उभी असल्याने त्यास मतदान करण्याचा आनंद, सौभाग्य मावळवासीयांना आहे. विकास अमुकतमुक करा, असे पवारांना सांगण्याची गरज नसून विकासाच्या ‘बारामती मॉडेल’चे कौतुक पंतप्रधानांनीही केलेले आहे. पार्थ यांनी बारामतीसारखा मावळचा विकास करू, असे सांगितले असून लोकांना आणखी काय अपेक्षित आहे ? गल्लीतील राजकारणासाठी आपणास खासदार नको तर संसदेत जाऊन इंग्रजी, हिंदीत प्रश्न मांडणारा खासदार हवा, असं त्यांनी म्हटलं.