कृषी कायद्यांविरोधात राहुल गांधी, शरद पवार यांच्यासह 5 नेते राष्ट्रपतींना भेटणार; मोदी सरकारवर दबाव आणणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रातील भाजप सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात विरोधी पक्षांचे एक प्रतिनिधी मंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्यासह 5 नेते बुधवारी संध्याकाळी पाच वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. अशाप्रकारे नरेंद्र मोदी सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे समजत आहे.

कोरोनाच्या प्रोटोकॉलमुळे केवळ 5 नेत्यांना राष्ट्रपतींना भेटण्याची परवानगी दिलीय. विरोधी पक्षांचे नेते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत, यासंदर्भातील माहिती सीताराम येचुरी यांनी माहिती दिलीय. उद्या काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माकपचे सीताराम येचुरी, सीपीआयचे डी. राजा आणि डिएमकेचे टीकेएस एलनगोवन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत.

दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलन करत असलेल्या 3 कृषी कायद्याच्या मुद्द्यांवरून विरोधी पक्षांचे नेते राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. मागील काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब व हयियाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने संसदेमध्ये आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

याबाबत सरकारशी चर्चेच्या फेर्‍या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नाही, हे चित्र असल्याने शेतकरी संघटनांनी मंगळवारी ’भारत बंद’ची हाक दिलीय. शेतकर्‍यांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला देशभरात चांगला प्रतिसाद मिळलाय. तसेच, विविध राज्यामध्ये अनेक पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.

’भारत बंद’ आणि शेतकर्‍यांचे तीव्र आंदोलन या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सायंकाळी 7 वाजता शेतकरी नेत्यांची बैठक बोलावलीय, ही अत्यंत महत्वाची बातमी आहे, कारण अमित शहा यांनी ही बैठक अचानक बोलावलीय.

याअगोदर सरकारने येत्या 9 डिसेंबर रोजी शेतकर्‍यांसोबत पुन्हा बैठक घेण्याचे ठरविले असताना ही बैठक बोलाविली आहे.

या बैठकीसाठी सिंधू, टिकरी आणि गाजीपूर बार्डरवर आंदोलन करणार्‍या शेतकरी नेत्यांना बोलविले असून एकूण 13 नेते अमित शहा यांची भेट घेतील, असे सांगण्यात येतंय.

याबाबत शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले की, मला फोन आला, गृहमंत्री अमित शहा यांनी बैठक बोलावलीय. आम्ही जाऊ आणि अन्य नेते सुद्धा बैठकीला येतील. त्यांनी सात वाजता बोलविलंय.