ब्राह्मण समाजाविषयी वादग्रस्त विधान, राजू शेट्टी यांच्याविरोधात गुन्हा दाखल

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि विद्यमान खासदार राजू शेट्टी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ब्राह्मण समाजाविषयी केलेल्या विधानाबाबत राजू शेट्टी यांच्याविरोधात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हातकणंगले पोलीस ठाण्यात राजू शेट्टी यांच्या विरुद्ध आचारसंहितेचा भंग आणि लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ च्या कलम १२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरारी पथक क्रमांक ३ चे प्रमुख मेघराज घोडके यांनी फिर्याद दिली आहे.

हातकणंगले येथील हेरलेयेथे २ एप्रिल रोजी झालेल्या सभेत शेट्टी यांनी ब्राह्मण समाजाबद्दल वादग्रस्त विधान केले होते. सीमेवर आमची पोल जातात, देशपांडे-कुलकर्ण्यांची नाही. कुलकर्णी, देशपांडे, जोशी या अडनावाच्या व्यक्ती सैन्यात कधीच भरती होत नाहीत. शेतकऱ्यांचीच मुले सैन्यात असतात, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर अनेक संघटनांनी संताप व्यक्त करत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.

या सर्व पार्श्वभूमीवर हातकणंगले मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी नंदकुमार काटकर यांनी राजू शेट्टी यांना शुक्रवारी नोटीस बजावली होती.दाखल झालेल्या तक्रारीवर आयोगाने शेट्टी यांना २४ तासात खुलासा करण्यास सांगितले होते. मात्र नोटीस बजावून देखील शेट्टी यांच्याकडून शनिवारी संध्याकाळपर्यंत नोटीसला उत्तर दिले नाही.

राजू शेट्टी यांनी नोटीसला उत्तर न दिल्याने त्यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तसेच लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ अन्वये गुन्हा नोंद करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी काटकर यांनी दिले. त्यानुसार हातकणंगले पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.