पहिल्या टप्प्यातील ७ मतदारसंघात ११६ उमेदवार निवडणूक रिंगणात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत राज्यातील पहिल्या टप्प्याअंतर्गत सात मतदारसंघात नामनिर्देशनपत्रे वैध ठरलेल्या १४७ पैकी ३१ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतली असून, ११६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.

पहिल्या टप्प्यातील नामनिर्देशन पत्रांच्या छाननीअंती १४७ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली होती. या टप्प्यासाठी नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत आज दुपारी ३ वाजेपर्यंत होती. या मुदतीत १४७ पैकी ३१उमेदवारांनी माघार घेतली.

मतदारसंघनिहाय निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे : वर्धा लोकसभा मतदार संघ – १४, रामटेक मतदारसंघ – १६, नागपूर मतदारसंघ – ३०, भंडारा-गोंदिया मतदारसंघ – १४, गडचिरोली-चिमूर मतदारसंघ – ५, चंद्रपूर मतदारसंघ – १३ आणि यवतमाळ-वाशिम मतदारसंघात २४ उमेदवार निवडणूक लढवित आहेत.
दुसऱ्या टप्प्याअंतर्गत २७८ उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध

लोकसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १० मतदारसंघात छाननीअंती २७८ उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध ठरली असून उद्या दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येणार आहेत. त्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
दुसऱ्या टप्प्यातील नामनिर्देशनपत्रे वैध ठरलेल्या उमेदवारांची मतदारसंघनिहाय संख्या पुढीलप्रमाणे : बुलढाणा- 13, अकोला -12, अमरावती -३४, हिंगोली -३४, नांदेड- ५५, परभणी-२१, बीड-५३, उस्मानाबाद-२०, लातूर-१२ आणि सोलापूर -२४.