पुणे-बंगळुरू महामार्गावर कार-ट्रकचा भीषण अपघात ; ५ जागीच ठार

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – कारचे टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात ५ जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. आज रविवारी दुपारी दीडच्या सुमारास बेळगाव शहरातील श्रीनगर गार्डनजवळ हा अपघात घडला. सर्व मृत हे औरंगाबादचे रहिवासी असून मृतांची अद्याप ओळख पटली नसल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादहून कारने सहा जण बंगळुरूला निघाले होते. कार श्रीनगर गार्डनजवळ आली असता तिचे समोरील टायर फुटले. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले व ती थेट दुभाजककावरून पलीकडील रस्त्यावर गेली. यावेळी धारवाडहून कोल्हापूरकडे निघालेल्या ट्रकला कारची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात कारमधील पाच जण जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला. जखमीवर केएलई रुग्णालयात उपचार सुरू आहेत.