खळबळजनक ! रखवालदाराच्या 4 मुलांच्या निर्घृण हत्येनं जळगाव हदरलं

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – एका शेतातील रखवालदाराच्या चार मुलांची कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्हा हादरुन गेला आहे. ही घटना रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे आज सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली. या हत्याकांडाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

रावेर शहरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरखेडा रस्त्यावरील मुस्तफा यांच्या शेतात सालदार म्हणून राहणाऱ्या मेहताब आणि रुमलीबाई भिलाल हे दाम्पत्य आपल्या मुळगावी मध्यप्रदेशातील खरगोल जिल्ह्यातील गढी येथे चुलत भावाच्या नातवाच्या दशक्रियाविधीसाठी गेले आहेत. घरात त्यांची चारही मुले एकटी होती. त्यातील सविता (वय-12), राहुल (वय-11), अनिल (वय-8) आणि राणी (वय-5) ही भावंडे एकटीच रहात होती. मोठी मुलगी सविता ही सर्वांची देखभाल करत होती. शेता शेजारीच हे कुटुंब घर बांधून राहत होते.

आज सकाळी शेत मालक मुस्तफा हे शेतावर गेले असता घराजवळ कुणीच दिसलं नाही. त्यांनी मुलांना आवाज दिला, पण कुणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी घरात डोकावून पाहिले असता चौघांचे मृतदेह आढळून आले. चौघांचे मृतदेह पाहून मुस्तफा यांना मोठा धक्का बसला. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे व अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. चौघांही चिमुरड्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. चौघांचा कुऱ्हाडीने घाव घालून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.