लॉकडाऊनमुळे तीन महिन्यांचे वीज माफ करावे, रामदास आठवलेंची सरकारकडे मागणी

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात लॉकडाऊन असून अनेक उद्योगधंदे बंद आहेत. लॉकडाऊनमुळे गरीबांचे तीन महिन्याचे लाईटबील शासनाने माफ करावे. सर्व बिल माफ करता येत नसतील तर किमान 50 टक्के बीलाची रक्कम माफ करावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. वीज बिलाची 50 टक्के रक्कम माफ करताना 25 टक्के बील वीज कंपनीने माफ करावे तसेच पुढील 4 महिने थकबाकीमुळे कोणाचीही वीज कापू नये, अशी सूचना त्यांनी वीज कंपन्यांना केली आहे.

मुंबई उपनगर येथे अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीने 18 टक्के विजबील माफ केले आहे. मात्र, आणखी विजबील माफ करण्याचे आपण त्यांना आवाहन केले असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली. मुंबई शहरात वीज पुरवठा बेस्ट करत असून मुंबई महापालिकेने स्थायी समितीमध्ये याबाबत ठराव करून तीन महिने विजबिल किमान 50 टक्के माफ करण्यासाठी निर्णय घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
विजबिल माफ करण्यासोबतच त्यांनी कोरोनाची चाचणी मोफत किंवा कमी दरात करण्याची मागणी केली. सध्या कोरोनाची चाचणी करण्यासाठी पाच हजार रुपयाचा खर्च येतो. त्याऐवजी मोफत किंवा अल्पदरात कोरोनाची चाचणी करावी, अशी आपली मागणी असून लवकरच याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.

तसेच खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद करू नयेत. कोरोनाला घाबरून जर खासगी डॉक्टर घरी बसले तर कोरोनाशी लाढा कसा जिंकणार, असा सवाल त्यांनी उपस्थित करत खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने सुरु करावेत असे आवाहन त्यांनी केले आहे. रुग्णालयातील डॉक्टर प्रमाणे नर्स यांनाही कोरोनाचे किट उपलब्ध करून दिले पाहिजे अशी मागणी आठवले यांनी केली आहे.