‘सरकार स्वत:ची जबाबदारी विसरणार हे कसं चालेल ?’ : राज ठाकरे

पोलिसनामा ऑनलाइन – खासगी डॉक्टारांच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा मुख्यमंत्री आणि सरकारला खडेबोल सुनावले आहेत. कोरोना काळात सेवा देणऱ्या खासगी डॉक्टरांच्या विमा कवच वरून राज ठाकरेंनी सरकारवर हल्ला चढवला आहे.

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्राचा फोटो ट्विटरवरून शेअर केला आहे. राज ठाकरे लिहितात, “मला काही खासगी सेवेतील डॉक्टरांचं शिष्टमंडळ भेटायला आलं होतं. मला त्यांनी सरकारी अनास्थेची जी घटना सांगितली आहे त्यामुळं माझं मन विषण्ण झालं आहे. मुळात जर खासगी सेवेती डॉक्टर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना विम्याचं कवच केंद्र सरकारच्या योजनेनुसार उपलब्ध आहे तर राज्य सरकार कोणत्या न्यायानं ते नाकारत आहे. याला असंवेदनशीलता नाही तर काय म्हणायचं? सरकार डॉक्टरांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणार परंतु सरकार स्वत:ची जबाबदारी विसरणार हे कसं चालेल? चूक आहे.”

राज ठाकरे पुढे लिहितात की, “माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की, तुम्ही या विषयात तात्काळ लक्ष घाला आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन खासगी सेवेतील असो वा सरकारी सेवेतील डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी असतील त्यांच्या अर्जावर तात्काळ कार्यवाही करा. आपण या विषयात डॉक्टर्स आणि त्यांच्या कुटुंबियांना योग्य न्याय द्याल अशी मला आशा आहे.

राज ठाकरेंनी यात असंही लिहिलं की, “महाराष्ट्र सरकारचं परिपत्रक आलं होतं की, कोरोनाच्या काळात डॉक्टर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचारी मग ते खासगे सेवेतील असो किंवा सरकारी रुग्णालयांच्या सेवेतील असोत या सगळ्यांना विम्याचं कवच असेल आणि जर यापैकी कोणाचाही कोरोनामुळं मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबाला या विम्यातून 50 लाख रुपये दिले जातील. जर खासगी डॉक्टारांचा कोरोना काळात सेवा देताना मृत्यू झाला तरी कुटुंबाला विम्याचा लाभ देण्याचं सरकार नाकारत आहे. असं कारण पुढं केलं जात आहे की, डॉक्टर खासगी सेवेत होता.”