एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार , जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी कारवायांना काही ठिकाणांहून निधी पुरविण्यात येत असल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. त्यानुसार राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून (एनआयए) श्रीनगरमधील ७ ठिकाणी शोध मोहिम राबविण्यात आली. त्यामध्ये गुन्हेगारी जगताशी संबंधित बरचंही सामान आणि माहिती ही यावेळी तपास यंत्रणेच्या हाती लागली आहे. त्यामध्ये लॅपटॉप, मोबाईल, पेन ड्राईव्ह, ई-टॅब्लेट, डीव्हीआर आणि संवादाची इतरही आधुनिक साधने आहेत. संपत्ती, पैशांच्या देवाण-घेवाणीची कागदपत्रे आणि बँक अकाऊंटचे डिटेल्सही एनआयएच्या हाती लागले आहेत. तसेच हुर्रियतचा प्रमुख मिरवेझ उमर फारूक यांचे पाकिस्तानशी असलेले हॉटलाईन कनेक्शनही तोडण्यात आले आहे. फारूककडे पाकिस्तानशी संपर्क साधण्यासाठी विशेष इंटरनेट सुविधा होती. ४० फूट खोल अँटींना बसवून हे कम्युनिकेशन करण्यात येत होते .
काश्मीरमधील विविध विचारप्रवाह असलेल्या संघटनांच्या नेत्यांना असलेला धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने फुटीरतावादी नेत्यांना सुरक्षा पुरवली होती. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने काश्मीर खोऱ्यातील सहा प्रमुख फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा व्यवस्था, त्यांना देण्यात आलेल्या गाड्या आणि इतर सुविधा काढून घेण्यात आल्या आहेत. मीरवाईज उमर फारुक, अब्दुल गनी भट, बिलाल लोन, हाशिम कुरेशी, फजल हक कुरेशी आणि शब्बीर शहा या नेत्यांचा समावेश आहे. त्यानंतर आम्ही कधीच सुरक्षा मागितली नव्हती,’अशी उर्मट प्रतिक्रिया हुर्रियत नेत्यांनी दिली.