लग्नपत्रिकेत नावं टाकण्यावरून पतीने केला पत्नीचा खून ; मुलीवरही केले चाकूने वार

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – मुलीच्या लग्नाच्या पत्रिकेत नावं टाकण्यावरून झालेल्या वादात पतीने पत्नीचा खून केला. तर मुलीवरही चाकूने वार केले. मुलगी गंभीर जखमी झाली असून हल्लेखोर बाप मात्र पसार झाला आहे. ही घटना कल्याणच्या ठाणकरपाडा येथे गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली.

मनीषा महाजन (वय. ४५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर पती मोहन गुरुनाथ महाजन(५२) हा पसार झाला आहे.

मोहन महाजन हा रिक्षाचालक आहे. कल्याण येथील पश्चिम ठाणकरपाडा येथे तो आपली पत्नी मनिषा आणि मुलगी गौरवी यांच्यासोबत राहतो. त्याची मुलगी गौरवी हिचे लग्न ठरलेले होते. दरम्यान गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मोहनचा लग्नपत्रिकेत नावं टाकण्यावरून पत्नीसोबत वाद झाला.

त्यानंतर त्याला राग आल्याने त्याने तिच्यावर चाकूने वार केले. त्यानंतर मुलगी गौरवी हिच्यावरदेखील हल्ला केला. त्यात पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर मुलगी गौरवी ही गंभीर जखमी झालेली आहे. तिच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.