भाजप प्रवेशावर गुलाम नबी आझाद यांचे सणसणीत उत्तर, म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   चार दशकांच्या संसदीय कालावधीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद राज्यसभेतून निवृत्त झाले. जवळपास २८ वर्ष ते राज्यसभेचे खासदार होते. त्यांच्या निरोप समारंभावेळी अनेक नेत्यांनी आझाद यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आझाद यांच्या कामाचं खूप कौतुक केले होते. विशेष म्हणजे एका घटनेचा उल्लेख करत मोदींना अश्रूही अनावर झाले. या सर्व घडामोडींनंतर सोशल मीडियावर उलटसुलट राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे. आझाद यांच्या बाबत पंतप्रधान मोदींनी केलेल्या भाषणाने सर्वच अचंबित झाले आहेत. एकूणच या सर्व प्रकारामुळे गुलाम नबी आझाद हे भाजपात प्रवेश करतील असं सांगितलं जात होतं, परंतु या सर्व चर्चेवर खुद्द गुलाम नबी आझाद यांनी भाष्य करत या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ज्या दिवशी काश्मीरमध्ये काळा बर्फ पडेल त्यादिवशी मी भाजपात प्रवेश करेन अशा स्पष्ट शब्दात आझाद यांनी सांगितल्याने भाजप प्रवेश चर्चेला पूर्णविराम मिळाला.

मुलाखतीत आझाद यांनी म्हंटल आहे की, ज्यादिवशी काश्मीरमध्ये काळा बर्फ पडेल त्यादिवशी मी भाजपात प्रवेश करेन, फक्त भाजपाच नाही तर अन्य कोणत्याही पक्षात प्रवेश करू शकतो, जे लोक अशाप्रकारे अफवा पसरवत आहेत त्यांना माझ्याबद्दल काही माहिती नाही. विरोधी पक्षाच्या राजमाता शिंदे उपनेत्या होत्या तेव्हा माझ्यावर आरोप केले होते.त्यावेळी मी सांगितलं होतं अटलबिहारी वाजपेयी, शिंदे आणि एल के अडवाणी यांची कमिटी बनवून १५ दिवसांत रिपोर्ट द्यावा. त्या रिपोर्टमध्ये जर मी दोषी आढळलो तर कमिटी जी शिक्षा देईल ते मान्य असेल. त्यावेळी वाजपेयी सभागृहात म्हणाले होते, मी सभागृह आणि गुलाम नबी आझादांची माफी मागतो, कदाचित राजमाता शिंदे या त्यांना ओळखत नाही परंतु मी त्यांना ओळखतो असं आझाद यांनी सांगितले.

निरोपसमारंभात काँग्रेसने दिलेल्या प्रतिक्रियेवर आझाद म्हणाले की, काँग्रेस अध्यक्षांनी माझ्या कामाची प्रशंसा केली. आता आपल्याला पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी मिळून काम करायचं आहे असं सांगितले, त्यानंतर मी सोनिया गांधी यांची भेट घेतली, तेव्हा निवडणुकीसाठी तयार राहायचं असं त्या म्हणाल्या.

अझादाबद्दल काय म्हणाले होते पंतप्रधान ?

निरोप समारंभावेळी अनेक नेत्यांनी आझाद यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. पंतप्रधान मोदींनीही त्यांची प्रशंसा केली. ते म्हणाले, आझाद असे नेते आहेत जे आपल्या पक्षासह सभागृह आणि देशाची काळजी करत असतात. त्यांची विनम्रता, शांतता आणि देशासाठी काही करण्याची इच्छा कौतुकास्पद आहे. आगामी काळातही आझाद यांची ही कटिबद्धता त्यांना शांत बसू देणार नाही. त्यांच्या अनुभवाचा देशाला लाभ होत राहील असं सांगत मोदींनी काश्मीरात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत भावूक झाले.

आझाद केरळमधून पुन्हा राज्यसभेत जाणार?

काँग्रेसमधील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सोनिया गांधी यांना सोमवारी आझाद भेटायला गेले तेव्हा त्यांची राज्यसभेच्या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. आझाद यांनी काश्मीरमधूनच सभागृहात येण्याचा विषय काढला तेव्हा त्यांना मध्येच थांबवत सोनिया गांधी म्हणाल्या की, ‘काश्मीर नाही केरळमधून परत याल.’ केरळच्या तीन सदस्यांचा कार्यकाळ २१ एप्रिल रोजी संपत आहे. त्यात आययूएमएलचे अब्दुल वहाब, माकपचे के.के. रागेश आणि काँग्रेसचे वायलार रवि यांचा समावेश आहे. पक्ष सूत्रांनी सांगितले की, सोनिया गांधी वायलार रवि यांच्या जागी आझाद यांना संधी देऊ इच्छितात. त्यामुळे आझाद एप्रिलमध्ये राज्यसभेत परत येतील व तोपर्यंत काँग्रेस नवा विरोधी पक्ष नेता करणार नाही. आझाद राज्यसभेत परत आल्यानंतर ते विरोधी पक्ष नेता असतील.

हिंदुस्थानी मुस्लिम असल्याचा अभिमान

मी खूप नशिबवान आहे की, कधी पाकिस्तानात गेलो नाही. पण, मी जेव्हा तेथील परिस्थितीबाबत वाचतो, ऐकतो तेव्हा मला याचा अभिमान वाटतो की, आम्ही हिंदुस्थानी मुस्लिम आहोत. जगात जर कुणा मुस्लिमांना अभिमान असायला हवा, तर तो हिंदुस्थानी मुस्लिमांना असायला हवा. असे गुलाम नबी आझाद म्हणाले होते.