ईशान्य मुंबईचा वाद मिटत नसेल तर रामदास आठवलेंसाठी जागा सोडा : रिपाइं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा नविडणूक तोंडावर येऊन ठेपली असली तरी ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा तिढा अजूनही सुटला नसल्याचे दिसून येत आहे. हा तिढा सोडवण्यासाठी ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासाठी सोडावा अशी आग्रही मागणी रिपाइंतर्फे करण्यात आला आहे.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. मात्र, ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना भाजप यांचे एकमत होत नाही. या मतदारसंघात शिवसेना भाजपमध्ये टोकाचे वाद आहेत. हा वाद मिटविण्यासाठी ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासाठी सोडावा अशी आग्रही मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर आणि मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केली आहे.

इतकेच नव्हे तर, भाजपने ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ मन मोठे करून रिपब्लिकन पक्षासाठी सोडल्यास संपूर्ण देशभरात चांगला संदेश जाईल. ईशान्य मुंबईत शिवसेना भाजपचा सुरू असलेला टोकाचा वाद मिटवायचा असेल तर ही जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाने केली आहे.

विशेष म्हणजे, ईशान्य मुंबई हा मतदारसंघ आंबेडकरी जनतेचा बालेकिल्ला आहे त्यामुळे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला सुटल्यास या मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले हे निवडणूक लढतील त्याबाबत त्यांची तयारी आहे. असेही त्यांनी म्हंटले.