काश्मीरमध्ये चकमकीत ४ दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर : वृत्तसंस्था – पुलवामा येथील लस्सीपूरा भागात पहाटेपासून लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या चकमकीत ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. या दहशतवाद्यांकडून अनेक शस्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत.

दोन दिवसांपूर्वी दहशतवाद्यांकडून पुलवामाच्या त्राल परिसरात जवानांवर गोळीबार करण्यात आला होता. त्यामध्ये एका नागरिकाला गोळी लागून त्यात तो जखमी झाला होता. त्यानंतर सुरक्षा दलाने संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन हाती घेतले होते.
लस्सीपूरा भागात पहाटेपासून भारतीय जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरु होती. त्यात लष्कर-ए-तोएबाच्या ४ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. त्यांच्याकडून २ एके ४७ रायफल, १ एसएलआर आणि १ पिस्तुल हस्तगत करण्यात आले आहे. या चकमकीत ३ जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पुलवामा भागात महिन्याभरापूर्वी दहशतवाद्यांच्या आत्मघातकी पथकातील एकाने सीआरपीएफच्या जवानांच्या गाड्यांच्या ताफ्यात आपली कार घुसवून स्फोट घडवून आणला होता. त्यात ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर सुरक्षा दलाने काश्मीर भागात वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये या हल्ल्यात सहभाग असल्याचा संशय आलेल्या अनेक दहशतवाद्यांना कंठस्रान घातले आहे.