अण्णा हजारेंनी केलेल्या ‘त्या’ टीकेला जयंत पाटील यांनी दिलं उत्तर, म्हणाले…

सावंतवाडी : पोलीसनामा ऑनलाइन – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Social activist Anna Hazare) यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार म्हणजे चलती का नाम गाडी, थांबली तर खटारा असल्याची जोरदार टीका केली होती. अण्णांनी केलेल्या या टीकेवर राज्याचे जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी (jayant-patil-refrained-responding-anna-hazares-criticism) उत्तर देण्याचे टाळले. काय बोलायचे असा सवाल करत हसतच त्यांनी प्रश्नाला बगल दिली. मात्र, यावेळी त्यांनी महाविकास आघाडीने राज्यपालांकडे दिलेल्या बारा उमेदवाराची यादी मंजूर करतील, आतापर्यंत राज्यपालांनी कधीही अशी यादी नाकारली नसल्याचे म्हणाले.

पाटील हे रविवारी सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी रात्री उशिरा सावंतवाडीत माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, काका कुडाळकर, अबिद नाईक, पुंडलिक दळवी, रेवती राणे, प्रफुल्ल सुद्रिक आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री पाटील म्हणाले, की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यावर कोणताही अन्याय केलेला नाही, अशा प्रकारे कोणीही मंत्री कोणाचे नुकसान करत नाही. त्यामुळे आपले अपयश झाकण्यासाठी कोण टीका करत असेल, तर आम्ही काय बोलणार असा सवाल त्यांनी दीपक केसरकर यांचे नाव न घेता उपस्थित केला. दरम्यान, सिंधुदुर्गातील अवैद्य धंदे रोखण्यासाठी दिवाळीनंतर एक्साईज आणि पोलीस खात्याच्या माध्यमातून जॉईंट ऑपरेशन राबविण्यात येईल. आगामी काळात राष्ट्रवादीकडून महाविकास आघाडीचा धर्म पाळला जाणार आहे. येणाऱ्या सर्व पुढील निवडणुका एकत्र येवूनच लढवू, असे संकेत मंत्री पाटील यांनी दिले.

काय म्हणाले होते अण्णा हजारे
महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जोरदार टीका केली होती. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे चलती का नाम गाडी, थांबली तर खटारा, अशी परिस्थिती आहे, असा टोला अण्णांनी लगावला होता. एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात संवाद साधताना अण्णांनी ही टीका केली होती. लोकायुक्तांच्या नियुक्ती कायद्यासाठी मी राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांना पत्र लिहिली. पण मुख्यमंत्र्यांचा अपवाद वगळता कुणीही पत्राला उत्तर दिले नाही, असे अण्णांनी यावेळी सांगितले.