प्रामाणिकपणाचे फळ IAS अधिकाऱ्याची १० वर्षात २७ वेळा बदली

मानवाधिकार आयोगाकडे केली तक्रार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इमानदारीत प्रशासकीय सेवा केल्यामुळे मागील दहा वर्षात तब्बल २७ वेळा बदली करण्यात आल्याचा आरोप के. मथाई यांनी केला आहे. मथाई हे कर्नाटकामधील प्रशासकीय सेवेत असून सध्या ते सहाय्यक आयुक्त पदावर कार्य़रत आहेत. राज्याचे मुख्य सचिव यांच्यासह दहा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी छळ केल्या बाबतची तक्रार के. मथाई यांनी मानवाधिकार आयोगाकडे केली आहे. तसेच त्यांची पदोन्नती, इसेंटिव्ह आणि मिळणाऱ्या इतर सुविधा थांबविण्यात आल्या असल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

मथाई यांनी आपल्या तक्रारीत सर्वात जास्त आरोप कर्नाटकचे मुख्य सचिव विजय भास्कर यांच्यावर केले आहेत. मथाई सांगतात की, लोकायुक्तांनी माझी तक्रार ऐकून घेतली नाही. मुख्य सचिव ऐकत नाहीत, मुख्यमंत्री वेळ देत नाही. माझे सर्व दरवाजे बंद झाल्याने माझ्यासमोर मानवाधिकार आयोगाशिवाय दुसरा पर्य़ाय उपलब्ध नव्हता. राज्य मानवाधिकार आयोगाने के. मथाई यांचा तक्रार अर्ज मंजुर केला आहे.

के. मथाई यांनी मंड्यामध्ये कार्यरत असातना ३०० कोटी रुपयांचा जमीन घोटाळा उघडकीस आणला होता. तसेच बीबीएमपीमध्ये २००० कोटींचा घोटाळा समोर आणला होता. तेव्हापासून नेतेमंडळी आणि अधिकारी मला त्रास देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्‍यान, मुख्य सचिव विजय भास्‍कर यांनी सांगितले की, मला आतापर्यंत कोणत्‍याही प्रकारची नोटीस आली नाही. नोटीस मिळाल्‍यानंतर मी त्‍याला योग्‍य उत्‍तर देईन.