…अन् काही तासातच मंत्रीपदाच्या यादीतून नाव झालं ‘गायब’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात अखेर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार स्थापन झाले आणि अखेर काल मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. कोणत्या नेत्याला कुठल मंत्रीपद हे निश्चित झालं नसल तरी यात अनेक नेत्यांना डावलण्यात आले आहे. शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीत आमदार प्रकाश आबिटकर यांचे नाव असल्याचे समजल्यावर रात्री ११.३० वाजता काही कार्यकर्ते गारगोटीतून चार-पाच गाड्यांनी मुंबईला रवाना झाले होते. हे लोक पनवेलला पोहचेपर्यंत निरोप आला की, मंत्रिपदाची संधी हुकली आहे. हा निरोप कळताच नाराज होऊन नेत्यांवर आगपाखड करत हे कार्यकर्ते तेथूनच आमदार आबिटकर यांची भेटही न घेता माघारी परतले.

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते के. पी. पाटील यांचा पराभव करून प्रकाश आबिटकर यांनी आमदारकी कायम राखली. त्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आल्याने किमान आता तरी शिवसेना कोल्हापूरला प्रतिनिधित्व देईल, अशी अपेक्षा होती. शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेवून जिल्ह्यात राजकारण करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर पक्षाने अन्याय केल्याची भावना त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. आबिटकर यांच्यासाठी खासदार संजय मंडलिक यांनी जोरदार प्रयत्न केले. दोन खासदारांच्या जोडीला एक मंत्रिपद मिळाले तर शिवसेना भक्कम होईल, हे ‘मातोश्री’ला पटवून देण्याचा प्रयत्न झाला. सातारातून शंभूराजे देसाई व कोल्हापुरातून आबिटकर यांचा मंत्रिमंडळातील समावेश जवळपास निश्चित मानला जात होता.

जिल्ह्यात २०१४ ला शिवसेनेचे दहापैकी सहा आमदार होते. त्यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकालाही मंत्रिपदाची संधी दिली नाही. कोल्हापूरला गृहीत धरून चालल्याने त्याचे पडसाद २०१९ च्या निवडणुकीत उमटले आणि सहा वरून एकवर संख्याबळ आले. विशेष म्हणजे अपक्ष म्हणून निवडून आलेले राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या नावाची कोठेच चर्चा नव्हती; मात्र ते ‘डाकडॉर्स’ ठरले. रविवारी मध्यरात्री शिवसेनेच्या यादीत यड्रावकर यांचे नाव दिसले. त्यांच्या रूपाने कोल्हापूरला तिसरे मंत्रिपद मिळाले. रविवारी दिवसभर मुंबईत मंत्रिपदाच्या यादीवर खलबते सुरू होती; मात्र अंदाज येत नव्हता. जसजशी विस्ताराची वेळ जवळ येईल, तशी आबिटकर समर्थकांची घालमेल वाढली. गेले दोन-तीन दिवस सोशल मीडियावरून ‘नामदार आबिटकर’ अशा पोस्ट कार्यकर्त्यांच्या फिरत होत्या. त्यामुळे आमदार आबिटकर यांना मंत्रिपदाची खात्री होती.

आमदार आबिटकर यांचा फोन येईल आणि आपण तिकडे रवाना व्हायचे या तयारीनेच कार्यकर्ते बसले होते. पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडीच्या घडामोडीत प्राचार्य अर्जुन आबिटकर अडकले होते. रविवारी रात्री मुंबईला निघा, असा निरोप मिळाल्यानंतर कार्यकर्ते रवानाही झाले. मात्र, सोमवारी सकाळी यादीत नाव नसल्याचे समजल्यानंतर कार्यकर्ते नाराज झाले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/