औरंगाबादच्या रेल्वे अपघातातून वाचलेल्या मजुरानं सांगितलं नेमकं काय घडलं !

पोलिसनामा ऑनलाइन – औरंगाबाद जवळच्या बदनापूर-करमाड स्थानकादरम्यान आज पहाटे मालगाडी खाली चिरडून १६ मजुरांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण देश हेलावून गेला आहे. जालण्यात लॉकडाऊनमध्ये अडकलेले हे सर्व मजूर घरच्या ओढीने रेल्वे रुळाच्या मार्गे मध्यप्रदेशातील आपल्या गावी निघाले होते. सटाणा परिसरात ते रुळावर झोपी गेले असता मालगाडीने त्यांना चिरडले. यामध्ये १४ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांचा उपचाराला नेताना मृत्यू झाला असून ३ जखमींवर उपचार सुरु आहे. दरम्यान, या भीषण रेल्वे अपघातून बचावलेल्या तीन मधील एका मजुरानं घडलेला सगळा प्रकार सांगितला.

या तीन पैकी जखमी असलेल्या एका मजुरानं सांगितलं की, चालून चालून आम्ही थकलो होतो. पाणी प्यायलो आणि म्हटलं थोडा आराम करावा. त्याचवेळी रेल्वे रुळावर असतानाच थोडी धुंद आली आणि डोळा लागला. त्यानंतर समोरून कधी रेल्वे आली समजलंच नाही आणि माझ्या सहकाऱ्यांना चिरडून टाकलं. रेल्वे आल्याचं आम्हाला कोणालाच समजलं नाही. आमचा डोळा लागला होता. आम्ही सर्व १९ मजूर होतो. सर्व जण मध्यप्रदेशातीलच होतो. पण वेगवेगळ्या जिल्ह्यातील होतो, असं तो म्हणाला आहे.

पुढं बोलताना त्याने म्हटलं की, या अपघातातून आम्ही काका आणि पुतणे बचावलो आहे. माझ्या पुतण्याचं वय १९ वर्ष असून, माझं वय २१ वर्ष आहे. आम्ही दोघेही जानेवारीमध्ये येथे आलो होतो. घरी आई, बायको आणि दोन छोटी मुलं एकटीच असल्यानं आम्ही तिकडे निघालो होतो. औरंगाबादवरुन बस किंवा ट्रक मिळेल या उद्देशानं आम्ही आलेलो. काल रात्री ४ ते ५ दरम्यान तिकडून निघालो होतो. काही ठिकाणी थांबून एक एक चपाती खाल्ली होती आणि इतर चपात्या पुढील प्रवासादरम्यान खाण्यासाठी ठेवल्या होत्या. पण काळानंच आमच्यावर घाला घातला, अशी भावना त्या मजुरानं व्यक्त केली.

याबाबत मिळालेल्या बातमीनुसार अधिक माहिती अशी की, मध्यप्रदेशातील हे सर्व १९ जण मजूर जालना येथील एका कंपनीत काम करतात. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे हे मजूर जालना येथे अडकून पडलेले होते. याचवेळी, शासनाने परप्रांतीय मजुरांना घरी जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरु केल्याची माहिती या मजुरांना मिळाली. तसंच ती रेल्वे भुसावळ येथून मध्यप्रदेशला जाणार असल्याची माहिती या १९ मजुरांना मिळाली असता ते पोलिसांना चुकवून रेल्वे रुळाच्या मार्गे औरंगाबादच्या दिशेने चालत निघाले. सटाणा परिसरात रात्री थकून हे मजूर रेल्वे रुळावर झोपी गेले असता पहाटेच्या सुमारास अचानक एक मालवाहू रेल्वे त्यांच्या दिशेने आली. मात्र काही कळण्याच्या आतमध्ये १६ मजूर रेल्वे खाली चिरडले गेले, तर दोघांचा उपचाराला नेत असताना मृत्यू झाला असून तिघांना प्राण वाचविण्यात यश आले आहे.