तारण न ठेवता मिळणार एवढं कर्ज, RBI ची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये मोदी सरकारने घोषणांचा पाऊस पाडला. शेतकऱ्यांसाठी काही मोठ्या घोषणा होत्या. यानंतर आता आरबीआयनंही शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. शिवाय शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब अशी की, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कर्जाच्या रकमेतही आता वाढ होणार आहे. शिवाय या कर्जासाठी शेतकऱ्याला काहीही तारण ठेवावं लागणार नाही हे विशेष. आरबीआयच्या नव्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना 1 लाखाऐवजी आता 1 लाख 60 हजार कर्ज मिळणार आहे.

शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कर्जाच्या रकमेच्या मर्यादेत 60 हजार रुपयांनी वाढ केली असून आता शेतकऱ्यांना 1.60 लाख रुपयांचं कर्ज मिळणार आहे तेदेखील काहीही तारण न ठेवता. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी नियमांमध्ये बदल केल्याचं जाहीर केलं आहे. त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

सरकारकडून आता शेतकऱ्यांना विशिष्ट रक्कम मदतीच्या स्वरूपात मिळणार आहे. पीयूष गोयल यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या महत्त्वाच्या निर्णयाची घोषणा केली. या निर्णयानुसार, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजारांची मदत केली जाणार आहे. परंतु यासाठी काही अटीही आहे. ते म्हणजे जे खरोखरंच शेतकरी आहेत, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. 2015-16च्या कृषी जनगणनेत ज्यांची नावं आहेत, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. मुख्य म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेंतर्गत 31 मार्चपूर्वीच 2 हजार रुपयांचा पहिला हफ्ता जमा होणार आहे.

कृषी कर्जमाफीनं शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या नसल्याचंही सरकारच्या लक्षात आलं आहे. यामुळे आता कृषी कर्जमाफीनंतर सरकारनं शेतकऱ्यांसाठी ही नवी योजना आणली आहे. 12 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे असा दावा केंद्र सरकारनं केला आहे. दरम्यान या योजनेवर सरकारकडून 75 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.