राज्यात ठिकठिकाणी EVM मध्ये तांत्रिक बिघाड ; नांदेडमध्ये बददल्या ७८ मशीन

मुंबई : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणूकीतील दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यात ठिकठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाडाच्या घटना समोर येत आहेत. नांदेडमध्येही प्रचंड गोंधळ उडाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. भोकर, मुखेड, नांदेड उत्तर, दक्षिण देगलूर याठिकाणच्या मतदानकेंद्रांवर ७८ मशीन बंद पडल्या आहेत. त्यानंतर प्रशासनाने त्या बदलल्या आहेत. तर सोलापूर येथील १६७ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर एक तास उशीरा मतदान सुरु झाले. तर बुलढाणा, हिंगोली, अकोला, अमरावती, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर सोलापूर या मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडत आहे.

नांदेड मतदारसंघात कॉंग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण, भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह इतर उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत कैद झाले आहे. दरम्यान सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यापासूनच नांदेडमध्ये गोंधळाला सुरुवात झाली. नांदेडमधील भोकर, नायगाव, नांदेड उत्तर आणि दक्षिण, देगलूर, मुखेड येथील मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बंद पडल्या. प्रशासनाने तब्बल ७८ ईव्हीएम मशीन बदलल्या आहेत.

तर सोलापूरमध्य़े नेहरूनगर येथील १६७ क्रमांकाच्या केंद्रावर एक तास उशीरा मतदान सुरु झाले. दरम्यान ईव्हीएमच्या बिघाडामुळे मतदान केंद्रावरील मतदार दीड तास ताटकळत उभे होते. त्यानंतर मतदारांनी वेळ वाढवून देण्याची मागणी केली आहे. तर वंचित बहुजन आघाडीच्या समोरचे बटन दाबले तरी कमळालाच मतदान जात आहे. तर काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या समोरील बटन दबत नाही. असा आरोप प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी केले आहेत.

– हिंगोलीत बासंबा मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने ४१ मिनिटं उशीरा मतदानाला सुरुवात झाली.

– अकोला येथे गुडधी येथे व्हिव्ही पॅटमध्ये बिघाड, तर रिधोरा येथील मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड,

– बीडमध्ये धारूर तालुक्यात मोहखेडमध्ये मतदान केंद्रावर पावणे नऊच्या सुमारास मतदान सुरु झाले.

– उस्मानाबादमध्ये गुंजोटी, व उस्मानाबाद शहरात मतदान यंत्र बंद पडले होते. अर्ध्या तासाने मतदान सुरु झाले.