Mumbai News : काकोळी ग्रामपंचायत निकाल ! शिवसेनेसह भाजपालाही धक्का; मनसेच्या पॅनेलने मारली बाजी..

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात ग्रामपंचायत निवडणुक निकालाची उत्सुकता शेगेला पोहचली आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज हाती येत असून, या निकालाची आता लाखो उमेदवारांसह नागरिकांना प्रतीक्षा आहे.यादरम्यान एक महत्वाची माहिती पुढे आली आहे.

अंबरनाथ तालुक्यातील काकोळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा या युतीच्या पॅनलचा पराभव करीत मनसेच्या पॅनेलने आपली बाजी मारली आहे. या ग्रामपंचायतीवर एकूण सात सदस्यांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. त्यातील मनसेचे नरेश गायकर, सुरेखा गायकर, रेश्मा गायकर आणि जयश्री गायकर यांनी विजय मिळवत ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा फडकवला आहे. तसेच रत्नागिरीच्या दापोलीत देखील मनसेने खातं उघडलं आहे. दापोलीतील नवशी ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचे उपतालुकाध्यक्ष मिलिंद गोरीवले यांचा विजय झाला आहे.

या दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी दोन लाख ५० हजार १६८ एवढे मतदान झाले आहे. यात एक लाख ३१ हजार ९१६ पुरुषांसह एक लाख १८ हजार २५० महिला मतदार होते. या मतदानापैकी ८० टक्के मतदान झाल्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला. शेवटच्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी मिळण्यास रात्री उशिर होणार आहे; परंतु ५.३० वाजेपर्यंत साडेचार ते पाच टक्क्यांच्या अंदाजासह जिल्हाभरात ८० टक्के मतदानाचा अंदाज तहलीलदार राजेंद्र तवटे यांनी व्यक्त केला.