धोका टळला या भ्रमात राहू नका ! 30 जूननंतर लॉकडाऊन उठणार नाही : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. राज्यातील कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज (रविवार) राज्यातील जनतेशी संवाद साधला. 30 जून नंतर काय असा प्रश्न सर्वांना पडला आहे पण लॉकडाऊन उठणार नाही आणि सर्वकाही पुर्वी सारखं होईल असंही नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. लॉकडाऊनमध्ये आणखी शिथिलता आणणार आणि एक-एक गोष्ट सुरू करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले आहे. धोका टळला या भ्रमात राहू नका असंही ते म्हणाले.

1 जुलैपासून अत्यावश्यक गोष्टी सुरू होणार आहेत. अर्थचक्राला गती देण्यासाठी आपण काही गोष्टी सुरू करीत आहोत. आपण सध्या कात्रीमध्ये सापडलो आहोत. सर्व गोष्टींची काळजी घेऊनच आपल्याला पावले उचलावे लागतील. कोरोनाच्या लढयात कार्यरत असलेल्या डॉक्टरांनी सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांनी आभार मानले तसेच आम्ही सर्वजण तुमच्यासोबत असल्याचे त्यांनी डॉक्टरांना उद्देशून सांगितलं.

शेतकर्‍यांनी काळजी करू नये हे सरकार तुमचं आहे. ज्यांनी-ज्यांनी तुम्हाला फसवलं आहे त्यांना आपलं सरकार सोडणार नाही असे सांगुन मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेतकर्‍यांना मोठा दिलासा दिला आहे. आषाढी एकादशीला मी मुख्यमंत्री म्हणून नाही तर मी तुमच्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून एक वारकरी म्हणून पंढरपूरला पोहचणार आहे. विठूरायाला मी साकडं घालणार आहे की लवकरात लवकर कोरोनाचं संकट दूर होऊ दे म्हणून. कादाचित देशातील सर्वात मोठं प्लाझमा थेरपीचं सेंटर आपल्या राज्यात असेल. कोरोनामुक्त झालेल्यांना मुख्यमंत्र्यांनी प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन केलं आहे.