‘साताऱ्यात निवडून येण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांना शरद पवारांची मदत घ्यावी लागते’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘साताऱ्यात निवडून येण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांना शरद पवारांची मदत घ्यावी लागते. या सर्व मंडळींनी काँग्रेस पक्षाला कायस्वरुपी सक्रिय अध्यक्ष हवा अशी मागणी सोनिया गांधींकडे करावी याची गमंत वाटते.’ अशा शब्दांत काँग्रेस नेतृत्वाला पत्र पाठवणाऱ्या जेष्ठ नेत्यांवर सामनातून टोला लागवण्यात आला आहे.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामानाच्या अग्रलेखातून काँग्रेस कार्यकारणी आणि काही नेत्याच्या ‘पत्र’प्रपंच यावरती भाष्य करण्यात आलं आहे. त्यावेळी भाजपावरही टीका करण्यात आली आहे. नेत्यांना पक्षात जमलं नाही की ते भाजपचा हात धरतात याला सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी तरी काय करणार? म्हणूनच ‘पत्र पुढाऱ्यां’नी घेतलेल्या भूमिकेस व्यापक पाठिंबा मिळू शकला नाही, असे सांगतानाच काँग्रेस वर्किंग कमिटीतील वादळ व आधीचे पत्र प्रयोग म्हणजे आडगावच्या चार हौशा गवशांनी बसविलेला ‘एकच प्याला’ या नाटकाचा रेंगाळला प्रयोग होता. नाटक बसले नाही व पत्राच्या मुर्खपणामुळे नाटक जागेवरच बंद पाडले, अशी टीका शिवसेनेनं केली आहे.

काय म्हटलं अग्रलेखात ?

– काँग्रेसच्या २३ प्रमुख नेत्यांच्या पत्राने निर्माण केलेलं वादळ तूर्त थंडावले आहे असे दिसते. मुळात पक्षात वादळ निर्माण करण्याची क्षमता काँग्रेस पक्षातील एखाद्या नेत्यात तरी उरली आहे काय? काँग्रेस पक्षाला पूर्णपणे सक्रिय अध्यक्ष हवा अशी मागणे करणारे एक पत्र जुन्या पुढाऱ्यांनी सोनिया गांधी यांना लिहले, त्या सर्व नेत्यांनी वयाची सत्तरी ओलांडली आहे. त्यापैकी एकही देश पातळीवर, राज्य पातळीवर सोडाच, पण जिल्हा पातळीवरदेखील लोकांचा नेता नाही.

– अनेक नेत्यांनी काँग्रेस किंवा गांधी-नेहरू परिवाराच्या बळावर मुख्यमंत्री पदापासून केंद्रीय मंत्रीपदापर्यंत अनेक महत्वाच्या गाद्या मळल्या आहेत. पी. चिदंबरम हे निष्णात वकील आहेत, पण ते नेते कधी झाले? राजीव गांधींशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी काँग्रेस सोडली होती व तामीळनाडूत स्वतःचा पक्षही काढला होता, पण लोकांचे समर्थन नसल्याने त्यांना हा पक्ष गुंडाळावा लागला. गुलाब नवी आझाद, कपिल सिब्बल, आनंद शर्मा हे जुनेजाणते नेते आहेत. शर्मा यांनी तरुणपणात काँग्रेस खस्ता खाल्ल्या तशा. श्री. आझाद यांनीही खाल्ल्या. कपिल सिब्बल यांनी अनेक वर्षे पक्षाची कायदेशीर बाजू भक्कमपणे संभाळली, पण या घडीस त्यांची सद्दी संपली आहे.

– पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा यांच्याविषयी आम्ही जास्त काय बोलावे? साताऱ्यात निवडून येण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांना शरद पवारांची मदत घ्यावी लागते. या सर्व मंडळींनी काँग्रेस पक्षाला कायमस्वरूपी सक्रिय अध्यक्ष हवा अशी मागणी सोनिया गांधींकडे करावी यांची गंमत वाटते. आता पक्षाला सक्रिय करायचे म्हणजे काय व पक्षाला सक्रिय करण्यासाठी या ‘पत्रनेत्यां’ना कोणी रोखले आहे? 70 वर्षांच्या सोनिया गांधी यांनी पक्षांतर्गत संगीत खुर्ची, खो-खो, हुतुतू, आट्यपाट्यांचे सामने भरवून सक्रियता दाखवावी असे या मंडळींना वाटते काय? दुसरे असे की, राहुल गांधी हे सक्रिय होतेच व त्यांनी एकाकीपणे मोदी-शहांना अंगावर घेतले. विधानसभा निवडणुकांत त्यांनी देश पालथा घातला. भाजपकडून त्यांच्यावर कमरेखालचे हल्ले झाले तेव्हा हे सक्रिय ‘पत्र पुढारी’ कुठे होते? राहुल गांधी यांचे खच्चीकरण मोदी-शहांच्या भाजपने केले नसेल तेवढे पक्षांतर्गत जुन्या कोंडाळ्याने केले आहे.

– राजस्थानात सचिन पायलट यांनी बंड केले तेव्हा सत्ता वाचवण्यासाठी अशोक गेहलोत यांनी केलेली धडपड देशाने पहिली. ही धडपड स्वतःची खुर्ची टिकवण्यासाठी होती. मध्यप्रदेशात जोतिरादित्य शिंदे काँग्रेसमधून पळून गेले. कमलनाथ व दिग्विजय सिंग यांच्या साठमारीतून ते गेले. शिंदे यांना काँग्रेसने कमी दिले होते? सर्व जुने नेते स्वतःचे ‘स्थान’ जपण्यासाठी भाजपशी हातमिळवणी करतात, पण पक्ष म्हणून मोठी झेप घ्यावी असे त्यांनी वाटत नाही.

– लोकसभा निवडणुकीत गेहलोत यांनी आपले पुत्र व बगलबच्च्यांना तिकिटे वाटली. जोधपुरातून मुख्यमंत्री गेहलोत यांना आपल्या पुत्रासही विजयी करता आले नाही. मध्य प्रदेशात कमलनाथ यांचे पुत्र जिंकले, पण काँग्रेस हरली. राज्याराज्यांचे काँग्रेसचे वतनदार स्वतःपुरते पाहतात. पक्ष त्यांच्या खिजगणतीतही नाही. पक्षात जमले नाही की भाजपमध्ये पळायचे हीच सध्या सक्रियता झाली आहे. हा नवा ‘राजकीय कोरोना व्हायरसच’ म्हणावा लागेल.