Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 20206 रूग्णांची ‘कोरोना’वर मात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले असून राज्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 12 लाखांच्यावर पोहचली आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस विक्रमी भर पडत आहे. रुग्ण वाढत असताना राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या 24 तासात राज्यात 20 हजार 206 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. आतापर्यंत 9 लाख 36 हजार 554 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 75.36 टक्के आहे.

रुग्ण बरे होत असताना नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 18 हजार 390 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 12 लाख 42 हजार 770 एवढी झाली आहे. तर राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 20.65 टक्के इतके आहे. रुग्ण वाढत असताना मृतांची संख्या देखील वाढत आहे. गेल्या 24 तासात 392 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर राज्यात आतापर्यंत 33 हजार 407 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्य होण्याचे प्रमाण 2.69 टक्के आहे.

सध्या राज्यामध्ये 2 लाख 72 हजार 410 रुग्ण अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आजच्या घडीला 18 लाख 70 हजार 200 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 34 हजार 982 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 60 लाख 17 हजार 284 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 12 लाख 42 हजार 770 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर इतरांचा निगेटिव्ह आला आहे.