Coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोनाचे थैमान सुरुच ! गेल्या 24 तासांत 802 जणांचा मृत्यू, 63,282 नवे पॉझिटिव्ह

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात कोरोना व्हायरसचे थैमान सुरु आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरात यांसारख्या राज्यांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र, महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा सर्वाधिक आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 63,282 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 61,326 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, यामध्ये 802 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आत्तापर्यंत 46,65,754 जणांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला होता. मात्र, त्यापैकी 39,30,302 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या कोरोनाचे 6,63,758 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात सध्या 40,43,899 रुग्ण होम क्वारंटाईन असून, 26,420 जणांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

आत्तापर्यंत अडीच कोटींपेक्षा जास्त चाचण्या

महाराष्ट्रात आत्तापर्यंत 2,73,95,288 नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये 46,65,754 चाचण्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी 39,30,302 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुण्यात सर्वाधिक रुग्ण

पुण्यात आत्तापर्यंत 8,53,230 प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये 7,38,682 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर 9642 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पुण्यात सध्या 1,04,849 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

मुंबईतही वाढतीये कोरोनाबाधितांची संख्या

मुंबई, पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईत आत्तापर्यंत 6,52,368 प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये 5,74,202 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर 13215 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबईत सध्या 63,325 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.