Lockdown : मुंबईहून चालत निघालेल्या चाकरमान्याचा मृत्यू, प्राण्यांनी खाल्ला मृतदेह

पोलिसनामा ऑनलाईन – लॉकडाउनमुळे देशभरातील विविध ठिकाणी अनेक कामगार, चाकरमानी अजूनही पायपीटच करत आहे. वाहन उपलब्ध होत नसल्यामुळे मुंबईतील अनेक चाकरमानी सलग चालत घर गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. रस्त्यात येणार्‍या आव्हांनाचा सामना करत घराच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. अशातच मुंबईतून पायी घरी चाललेल्या एका चाकरमान्याचा पेण येथे मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह प्राण्यांनी खाल्ल्याचे दिसून आले आहे.

मुंबई गोवा महामार्गावर चालत निघालेल्या एका चाकरमान्याचा वाटेतच मृत्यू झाला आहे. पेण तालुक्यातील जिते गावाजवळ ही घटना घडली आहे. मोतीराम जाधव असे मृत व्यक्तीचे नाव असून. कांदिवली येथून श्रीवर्धन येथील गावी ते कुटुंबासह निघाले होते. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली आहे. डिहायड्रेशनमुळे त्याचाा मृत्यू झाला आहे. लॉकडाउन दरम्यान चाकरमान्याचा मृत्यू होण्याची रायगड जिल्ह्यातील ही तिसरी घटना आहे. याआधीही कोकणात जाणार्‍या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यापूर्वी ठाणे येथून खेड तालुक्यातील आपल्या गावाकडे चालत जात असलेल्या एका इसमाचा फाळकेवाडी गावाजवळ मृत्यु झाला. तीन ते चार दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याचा मृतदेह प्राण्यांनी खाल्लेल्या अवस्थेत होता.