खुशखबर ! अखेर मान्सून राज्यात दाखल, 22-23 जूनला कोकण, मराठवाडयासह मध्य महाराष्ट्रात ‘धो-धो’ पावसाची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे लांबलेला मान्सून अखेर आज दाखल झाला. अवघा महाराष्ट्र आणि बळीराजा गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनची डोळ्यात प्राण आणून मान्सूनची वाट पाहत होता, ती प्रतीक्षा आता संपली आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये आज मान्सूनने हजेरी लावली. या जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पाऊस झाला. हवामान विभागाने सांगितलेल्या अंदाजानुसार पुढील ४ दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर मान्सून सक्रिय होईल.

दरवर्षी प्रमाणे जून च्या पहिल्या आठवड्यात म्हणजे ७-८ जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणे अपेक्षित होते. मात्र मधील काळात वायू चक्रीवादळामुळे मान्सून पुढे सरकण्यासाठीचे पोषक असणारे वातावरण बिघडले होते. ‘वायू’मुळे वातावरणातील आर्द्रता निघूल गेल्याने मान्सूनचा प्रवास खंडित झाला होता. मात्र कालपासून पुन्हा मान्सूनसाठीचे पोषक वातावरण तयार झाल्यामुळे मान्सून आज महाराष्ट्रात दाखल झाला.

महाराष्ट्राच्या दक्षिण किनाऱ्यावर आणि दक्षिण मध्य महाराष्टातील काही भागात मान्सूनमुळे पाऊस झाला. महाराष्ट्राच्या पूर्व म्हणजे विदर्भाच्या काही भागात मात्र मान्सूनचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. विदर्भाच्या गडचिरोली आणि नागपूर भागात देखील पावसाने हजेरी लावली. तसेच हवामान विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्राचा उर्वरित भाग म्हणजे मराठवाडा, कोकण इत्यादी ठिकाणी देखील मान्सूनचा मुसळधार पाऊस २२-२३ जून पर्यंत हजेरी लावेल.

गेल्या २० वर्षात पहिल्यांदाच इतका उशिरा
यावर्षी राज्यात मान्सून जवळपास २ आठवडे उशिरा दाखल झाला. हवामान विभागाच्या माहितीनुसार मागील २० वर्षात प्रथमच मान्सून एवढ्या उशिरा दाखल झाला आहे. असे असूनही पावसाळ्याच्या शिल्लक राहिलेल्या दिवसांत मान्सून पावसाची दरवर्षीची सरासरी पासून भरून काढेल.

आज गोवा वेधशाळेने मान्सूनची अधिकृत घोषणा केली. केरळ, केनाटकमार्गे गोव्यात येणार मान्सून यंदा २ आठवडे उशिरा दाखल झाला. त्यांनतर महाराष्ट्राच्या दक्षिण भागात देखील मान्सूनने हजेरी लावली. मच्छिमारांना दक्षतेचा इशारा देत समुद्र खवळलेला असल्याने समुद्रात न जाण्याच्या सूचना वेधशाळेने दिल्या आहेत.