सुबोध भावे संतापला, म्हणाला – ‘माणूस म्हणवून घ्यायची लाज वाटतेय’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   गरोदर हत्तीणीला फटाक्यांनी भरलेले फळ खायला देऊन निर्दयीपणे हत्या केल्याप्रकरणी अभिनेता सुबोध भावेने संताप व्यक्त केला आहे. माणूस म्हणवून घ्यायची लाज वाटतेय अशा शब्दांत भावेने घटनेचा निषेध केला असून कडक कारवाई केला जावी अशी मागणी केली आहे. जी शिक्षा एखाद्या माणसाच्या बाबतीत दिली गेली असती त्याचप्रमाणे आत्ताही दिली गेली पाहिजे असे त्याने व्यक्त केले आहे.

सुबोध भावेने ट्विट करत, प्राण्यावर आपण उदंड प्रेम करतो, त्याला आणि त्याच्या येऊ घातलेल्या जीवाला ज्या क्रूर पद्धतीने वागवण्यात आले. हे पाहून माणूस म्हणवून घ्यायची लाज वाटतेय. जी शिक्षा एखाद्या माणसाच्या बाबतीत दिली गेली असती त्याचप्रमाणे आत्ताही दिली गेली पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे.केरळमधील मल्लपुरम जिल्ह्यात स्थानिक गावकर्‍यांनी एका गरोदर हत्तीणीला फटाक्यांनी भरलेले अननस खायला दिल्यामुळे तिचा मृत्यू झाला. 27 मे रोजी घडलेली ही घटना केरळमधील वन-अधिकार्‍याच्या फेसबूक पोस्टमुळे समोर आली. अनेकांनी या घटनेवर नाराजी व्यक्त केली असून दोषींना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. या घटनेनंतर केरळ वन-विभागाने हत्तीणीच्या मारेकर्‍यांचाा शोध सुरु केला आहे.