‘… तर मी स्वतः औरंगाबादचं नाव संभाजीनगर होण्यासाठी पुढाकार घेईल’ : MIM खा. इम्तियाज जलील

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे आणि शिवसेना हे दोन पक्ष औरंगाबादचे नामांतर करण्याबाबत बोलत आहेत. शिवसेनेचे माजी खासदार तर कोणत्याही क्षणी औरंगाबादचे नाव बदलून संभाजी नगर होऊ शकते, असे म्हणत आहेत. मात्र या दोन्ही पक्षांनी प्रथम शहराच्या विकासासाठी काम करावे. पुढच्या चार वर्षात शहराचा विकास करुन दाखवावा. संभाजी महाराज हे महापुरुष होते. त्यांचे नाव द्यायचे असेल तर आधी शहराचा विकास करा. त्यानंतर नाव बदलण्यासाठी आम्ही तुम्हाला साथ देऊ, असे म्हणत एमआएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी नामांतराबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. ते औरंगबादमध्ये बोलत होते.

तर मी स्वतः औरंगाबादचे नाव संभाजी नगर होण्यासाठी पुढाकार घेईन, अशी औरंगाबादच्या नामांतराबाबत भूमिका मांडताना जलील पुढे म्हणाले की, येथील कट्टर शिवसैनिकांना विचारा की त्यांना औरंगाबादचे नाव बदलायचे आहे की विकास करायचा आहे? संभाजी महाराजांचे नाव औरंगाबादला देण्याच्या गोष्टी करणार्‍या शिवसेना आणि मनसेने चार वर्षात शहराचा विकास करुन दाखवावा. तुम्ही कचरामुक्त शहर करुन दाखवा, विकास घडवून दाखवा. तसे केल्यास मी स्वतः तुम्हाला नामांतरासाठी साथ देईन, असे जलील यांनी म्हटले.