सर्वोच्च न्यायालयाने मिराज लढाऊ विमानाबद्दलची याचिका फेटाळली 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मिराज २००० लढाऊ विमानाच्या अपघातप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.  मिराज लढाऊ विमाने ही जुनाट आहेत हे बहुतेक याचिकाकर्त्यांना माहीती नसावे, असे खडे बोल सुनावत न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी ही याचिका फेटाळली.

बंगळूरुतील एचएएलच्या विमानतळावर १ फेब्रुवारीला सकाळी मिराज २००० हे लढाऊ विमान कोसळून दोन पायलटांचा मृत्यू झाला होता. याविषयी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी एक समिती बनविली जावी जी या प्रकारच्या विमानांची तपासणी करेल. याशिवाय सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेमध्ये प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधीशाच्या देखरेखीखाली केली जावी.

गोगोई यांनी याचिकेवरील सुनावणीवेळी याचिका करणाऱ्यास ही विमाने कोणत्या पीढीतील आहेत, असा प्रश्न केला. याचिकाकर्ता या प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही. यामुळे त्यांनी याचिका फेटाळली.

मिराज लढाऊ विमान अपघात –
बंगळुरू येथे ‘मिराज २०००’ या भारतीय लढाऊ विमानाला अपघात होऊन स्क्वाड्रन लीडर नेगी आणि स्क्वाड्रन लीडर अबरोल या दोन पायलटचा मृत्यू झाला होता. दोन्ही पायलटनी हवेत विमानाला आग लागताच पॅरॅशूटच्या साह्याने उडी मारली होती. मात्र, एक पायलट विमानाच्या अवशेषांवर पडल्याने जागीच मरण पावला, तर दुसऱ्या पायलटचा उपचारावेळी मृत्यू झाला. दुर्घटनाग्रस्त झालेले लढाऊ विमान मिराज-२००० हे प्रशिक्षणार्थी विमान होते. या विमानातील पायलटही प्रशिक्षणार्थी होते.