महाराष्ट्रात येणारे लोंढे थोपविण्यासाठी महाराष्ट्राला विशेष दर्जा द्या : मनसे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आज महाअधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनामध्ये पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण करण्यात आले. आज अनावरण करण्यात आलेल्या झेंड्यावर राजमुद्रा वापरण्यात आली असून झेंड्याचा रंग भगवा आहे. त्यामुळे आगामी काळात मनसे हिंदुत्वाची भूमिका घेणार असे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे मनसेच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा ठेवण्यात आली असून मनसेची हिंदुत्वाच्या दिशेने वाटचाल करणार हे स्पष्ट होत आहे.

दरम्यान, मनसेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ट्विट करून, महाराष्ट्रात येणारे लोंढे थोपविण्यासाठी महाराष्ट्राला विशेष दर्जा देण्याची मागणी केली आहे. तसेच महाराष्ट्रातील स्थानिक भूमिपुत्रांना प्रामुख्याने प्राधान्य दिलं गेलंच पाहिजे आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालाच पाहिजे अशी मागणी ट्विटद्वारे केली आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेला आक्रमक हिदुत्वाची भूमिका घेण्यासाठी अडचणी येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. शिवसेनेने सुरुवातीपासूनच हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. आता मनसेने हिंदुत्वाची कास धरली असून त्यांनी हिंदुत्ववादी शिवसैनिकांना साद घालण्यास सुरुवात केली आहे.

मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी मनसेच्या झेंड्यावर राजमुद्रा छापण्याविषयी सांगताना म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा ध्वजामध्ये अंतर्भूत करणं ही खूप मोठी जबाबदारी आहे याची आम्हाला जाणीव आहे. मुघलांची आणि ब्रिटिशांची गुलामगिरीबद्दल बोललं जात. पण सव्वाशे वर्ष ह्या संपूर्ण भूप्रदेशावर मराठ्यांनी राज्य केले हे आपण विसरत असल्याचे त्यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा –