उसनवारीचे पैसे मागितले म्हणून दगडाने ठेचून खून, परिसरात तणाव

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – उसनवारीचे पैसे मागितल्याच्या रागातून दगडाने ठेचून खून करण्यात आला. उपचार सुरू असताना मध्यरात्री 12 वाजता जखमीचा मृत्यू झाला. जामखेड तालुक्यातील खर्डा गावात घटना घडली. या घटनेमुळे खर्डा गावात तणाव निर्माण झाला आहे.

बाळू बजरंग पवार (वय ४०, रा. कोष्टी गल्ली खर्डा, ता. जामखेड ) हे मयताचे नाव आहे. याप्रकरणी सुधीर बाळू वाळस्कर, आकाश बाळू वाळस्कर, योगेश बलभीम वाळस्कर, रोहित उर्फ बबलू बाळासाहेब गोलेकर, गौतम राहुल तादगे (सर्व रा. खर्डा, ता. जामखेड) या पाच जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मयताची मावशी वेणुबाई बाजीराव काळे यांनी जामखेड पोलीसात फिर्याद दिली आहे. सर्व आरोपी फरार आहेत. सर्व आरोपींना अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नसल्याचे मयताच्या
नातेवाईकांनी सांगितले. मृतदेह खर्डा येथे आहे. तसेच खर्डा बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

खर्डा येथे वातावरण तणावपूर्ण असून अनुचित प्रकार घडू नये म्हणून ट्रॅकींग फोर्स, राज्य राखीव पोलीस दल खर्डा येथे दाखल आहे. अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील, शेवगाव पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अवतारसिंह चव्हाण, निलेश कांबळे व पोलीस फौजफाटा खर्डा गावात आहे.

Visit : Policenama.com