‘ मावळमध्ये नवखा उमेदवार आला , तर त्याला सांभाळून घ्या ‘ : अजित पवारांचं भावनिक आवाहन

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –मावळमध्ये नवख्या उमेदावाराला उमेदवारी मिळाली तर त्याला सांभाळून घ्या ‘ असे भावनिक आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलं आहे. त्यांच्या या बोलण्यातून मावळमधून पार्थ पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचे संकेत मिळाले आहेत. काल (13 मार्च) अजित पवार यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

नवी मुंबईत काल अजित पवार यांनी शेकापच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, “पक्षाने तरुणांना संधी देण्याचा विचार केला आहे. उद्या पक्ष कोण उमेदवार देतो याचा निर्णय यायचा आहे. कदाचित उमेदवार नवखाही येण्याची शक्यता आहे. जर नवखा आला तर त्याला सांभाळून घ्या, अनुभवी आला तर प्रश्नच नाही. या गोष्टीचा विचार सर्व सहकाऱ्यांनी करावा.” इतकेच नाही तर, ” समोरचा उमेदवार तुल्यबळ असल्याचं समजून कामाला लागा. गाफील राहू नका, अशी सूचनाही अजित पवार यांनी दिली.

पार्थ पवारसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यातून उमेदवारी मागे घेतली. यानंतर पार्थ पवार यांचा मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचा जोर आणखीच वाढला आहे. मंगळवारी पार्थ पवार यांनी रायगडसह पिंपरी चिंचवड, पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यानंतर अजित पवार यांनी काल नवी मुंबईत कार्यकर्त्यांशी संवाद साधला.