पुरंदरच्या दक्षिण भागात देवीच्या रोगामुळे मेंढ्या पडू लागल्या मृत्यूमुखी

नीरा : पोलिसनामा ऑनलाईन (मोहंम्मदगौस आतार) – पुरंदरच्या दक्षिण भागातील नीरा नदी काठी असलेल्या जेऊर येथे मेंढ्यांना आलेल्या देवीच्या रोगामुळे आत्तापर्यंत दोनशे मेंढ्यांंचा मृत्यु झाला असुन आणखी सुमारे तीनशे पेक्षा जास्त मेंढ्या रोगग्रस्त असून योग्य उपचाराअभावी मृत्युच्या दारात उभ्या आहेत. मात्र पशुवैद्यकीय अधिकारीच या रोगाला औषध नसल्याचे सांगून हात झटकत असल्याने मेढपाळांनी जायचे कोठे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मेंढपाळांचा आधार नष्ट होऊ लागल्याने जेऊर परिसरातील मेंढपाळ मेटाकुटीला आला आहे.

पुरंदरच्या दक्षिण पुर्व भागातील राख, नावळी, कर्नलवाडी या गावातील मेंढ्यांना दोन महिण्यांंपुर्वी अतिवृष्टीमुळे फुटराॅट रोगाने ग्रासले होते. त्यावेळी शेकडो मेंढ्या मृत्यूमुखी पडल्या होत्या. त्यावेळी पशुवैद्यकीय अधिका-यांनी उपाय योजना करीत हा रोग आटोक्यात आणला. मात्र तरी देखील शंभर पेक्षा जास्त मेंढ्या मृत्यूमुखी पडल्या होत्या. यावेळी पुरंदरच्या दक्षिण भागातील नीरा नदीकाठच्या गावातील मेंढ्याना देवी या रोगाने ग्रासले आहे. या रोगाला कोणताच उपचार नसल्याचे पशुवैद्यकीय अधिका-यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे येथील मेढपाळांमध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जेऊर येथील शेतामध्ये अनेक ठिकाणी मृत्युमुखी पडलेल्या मेंढ्या पाहायला मिळत आहेत. येथील बाळू दुषन जाधव याच्याकडे १३० मेंढ्या होत्या पैकी १०० मेंढ्या मृत्युमुखी पडल्या, पांडुरंग दादा मोटे यांच्याकडे असलेल्या ९० मेंढ्या पैकी ५० मेंंढ्या तर महादेव बन्याबा मोटे यांच्याकडे १२५ मेंढ्या होत्या त्यातील ४० मेंढ्यांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. गेनबा मोटे यांच्याकडे १५० मेंढ्या होत्या यापैकी त्यांच्या ४७ मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या लोकांकडील मेंढ्याच्या मृत्यूचा आकडा दोनशेच्यावर जात आहे. आता जिवंत असलेल्या मेंढ्यापैकी जवळजवळ सर्वच मेंढ्यांना देवीच्या रोगाची लागण झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांंत त्या मेंढ्या सुद्धा मृत्यूमुखी पडणार हे मात्र निश्चित. त्यामुळे या मेंढपाळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून त्यांच्या जगण्याचा आधार, रोजी रोटी या रोगामुळे नष्ट झाली आहे. प्रशासनाकडून मात्र याबाबत कोणतीच दखल घेतली जात नाही. त्यामुळे पुढील काळात अशा रोगांवर उपचार शोधावा अशी मागणी लोकांंमधून होत आहे.

दरम्यान, सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतंय, तसेच शेतीशी निगडीत असलेल्या
पशुसंवर्धन विभागावर देखील कोट्यवधी रूपये खर्च करतंय. मग देवी सारख्या रोगावर उपचार होऊ शकत नाही असं कसं.? असा संतप्त सवाल मेंढपाळ बाळू जाधव यांनी केला आहे. जि.प.च्या पशुसंवर्धन विभागाने तातडीने उपाययोजना करून मृत्युमुखी पडलेल्या मेंढ्यांचा पंचनामा करण्याची मागणी मेंढपाळ करीत आहे.

पशुवैद्यकीय अधिकारी प्रशांत उटगे म्हणाले की, मुख्यत्वे करून देवी हा रोग नीरा नदीकाठच्या गावांमधून पाहायला मिळतो आहे. तसेच हा रोग विषाणूजन्य आहे. हा रोग येण्यापूर्वीच लसीकरण करणे महत्त्वाचे असते. तसेच ह्या रोगावर औषधोपचार केल्यानंतर त्याचा परिणाम होण्यासाठी २१ दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे मेंढपाळांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. या रोगावर अजून पर्यंत कोणताही रामबाण उपचार नसून प्रतिजैविके देऊन व जखमांवर मलम लावून उपचार केले जातात.

मेंढपाळ बाळू जाधव म्हणाले, माझ्या शंभर मेंढ्या मृत्यूमुखी पडल्या तरी देखील महसूल किंवा पशुवैद्यकीय विभागाने दखल घेतली नाही. साधा पंचनामा देखील केला गेला नाही. आमची उपजीविका यावर अवलंबून आहे. आम्हाला रोगातील काही कळत नाही. त्यातच हा रोग पहिल्यांदाच आला. डॉक्टर येईपर्यंत निम्म्या मेंढ्या मृत्युमुखी पडल्या.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/