NDA मध्ये सध्या धुसफूस वाढली, BJP ला धक्का बसणार ? JDU आमदाराचा खळबळजनक दावा

पटणा : वृत्तसंस्था – नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप (BJP) आणि जेडीयु (JDU) पक्षाने काठावरच बहुमत मिळवत राज्यात पुन्हा सत्ता प्रस्थापित केली. मात्र आता बिहारच्या राजकारणात पुन्हा मोठी हालचाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जेडीयू आमदार गोपाल मंडल यांच्या विधानामुळे सध्या बिहारमधील राजकीय वातावरण तापले असून येथे राजकीय भूकंप होणार असल्याचे बोलले जात आहे. बिहारमध्ये सत्तेत असणाऱ्या NDA मध्ये सध्या धुसफूस वाढली आहे. यातच 6 महिन्यानंतर मुख्यमंत्री असलेले नितीश कुमार पायउतार होतील आणि राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव राज्यात सत्ता स्थापन करतील असा दावा सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने केल्याने चर्चेला उधाण आले आहे.

243 सदस्य असलेल्या बिहार विधानसभेत बहुमताचा आकडा 123 आहे. निवडणुकीत एनडीएला 125 तर आरजेडीच्या नेतृत्वातील महाआघाडीला 110 जागा मिळाल्या होत्या. एनडीएमध्ये भाजपाला 74 तर जेडीयूला 43 आणि इतर पक्षांना 8 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे या आकड्यात किंचीत बदल झाला तरी नितीश कुमार सरकार अडचणीत येऊ शकते.

गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे उमेदवार रोहित पांडेय यांची एक ऑडिओ क्लीप प्रचंड व्हायरल होत आहे. ही क्लीप व्हायरल झाल्यानंतर आमदार गोपाल मंडल यांची बदनामी झाली. यामुळे त्यांनी मीडियासमोर येऊन आपली बाजू मांडली. माध्यमासमोर बोलताना गोपाल मंडल म्हणाले की, नितीश कुमार हे दबंग मुख्यमंत्री आहेत. ते 6 महिन्यानंतर पायउतार होतील, त्यानंतर राज्यात तेजस्वी यादव मुख्यमंत्री बनतील असा दावा त्यांनी केला आहे.

गोपाल मंडल यांनी स्वत:लाही दबंग आमदार असल्याचा दावा केला. आम्ही आदेश काढून कोणालाही जिंकवू शकतो, रोहित माझा छोटा भाऊ आहे, जर तो आमच्यासोबत असता तर मंडल समाजाचे 35 हजार मते मिळून जिंकला असता. निवडणूक पाहून सांगू शकतो कोण जिंकणार आणि कोण हरणार आहे. इतकच नाही तर ऑडिओ क्लीप व्हायरल होण्याचे खापर मंडल यांनी भाजपाचे आमदार शैलेंद्र यांच्यावर फोडले आहे.

काँग्रेसचे आमदार फुटण्याचा माजी आमदाराचा दावा
बिहार विधानसभेतील काँग्रेसच्या 19 आमदारांपैकी 11 आमदार पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत, असा खळबळजनक दावा काँग्रेसचे नेते व माजी आमदार भरतसिंह यांनी केला आहे. राष्ट्रीय जनता दलाबरोबर काँग्रेसने युती करण्यास माझा ठाम विरोध होता. या युतीमुळे काँग्रेसने स्वत:चे खूप मोठे नुकसान करून घेतले आहे.